जांबुत : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात साडेपाच वर्षीय शिवन्या बोंबे आणि १३ वर्षीय रोहन विलास बोंबे या दोन निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या हृदयद्रावक घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडित बोंबे कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी ते अत्यंत भावूक झाले. तसेच कुटुंबाच्या दुःखाने त्यांनाही अश्रू अनावर झाले. बिबट्याच्या हल्ल्याच्या दोन्ही घटना ऐकून शिवन्या व रोहनच्या आई-वडिलांची व कुटुंबीयांची व्यथा पाहून जिल्हाधिकारी स्वतःला सावरू शकले नाहीत. त्यांनी पालकांना भेटून विचारपूस केली आणि धीर देण्याचा प्रयत्न केला. “या दुःखात आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत,” असे उद्गार काढत त्यांनी कुटुंबाला आधार दिला. त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी उपस्थितांच्या मनालाही हळहळ वाटली. या घटनेने संपूर्ण पिंपरखेड गाव शोकसागरात बुडाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बिबटे मुक्त करण्याचे आश्वासन दिले असून, त्यांची संवेदनशीलता व भावनिक आधार यामुळे पीडित कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.