जांबूत : शिरूर तालुक्याच्या बेट भागातील जांबूत, पिंपरखेड, चांडोह, फाकटे, वडनेर खुर्द सह टाकळी हाजी परिसरात अद्यापही बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार मागील पाच महिन्यात सुमारे ४० बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. अन्न-पाण्याचा शोधात या परिसरात बिबट्यांचे वास्तव्य अद्यापही कायम असून मंगळवारी (दि.१७) रोजी पहाटेच्या सुमारास जांबूत (ता. शिरूर) येथील शेतकरी पंढरीनाथ महादू कवडे यांचे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात सात वर्षीय मादी संवर्गातील बिबट्याला जेरबंद करण्यात आले. तर साबळेवाडी (ता. शिरूर) येथील शेतकरी संतोष हरिभाऊ पवार यांचे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात पाच वर्षीय मादी संवर्गातील बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून दोन्ही मादी बिबट्यांची माणिकडोह (ता. जुन्नर) येथील बिबट निवारण केंद्रात रवानगी करण्यात आल्याची माहिती वनरक्षक लहू केसकर यांनी दिली. ही कारवाई जुन्नरच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक लहू केसकर, वनसेवक महेंद्र दाते यांनी केली आहे. सध्याच्या काळात उसाचे तोडणीचा हंगाम संपलेला असल्याने बिबट्यांचा मुक्त संचार वाढू लागला असून आता बिबट्या वास्तव्यासाठी नव्याने लागवड केलेले उसाचे शेत, जनावरांचे खाद्य असलेले मकाचे पिक, केळीच्या बागा यांचा आसरा घेत असल्याचे दिसून येते. मात्र वनविभागाकडून योग्य प्रकारे कार्यवाही चालू असून ज्या ज्या ठिकाणी बिबट निदर्शनास येईल, त्या त्या ठिकाणी तत्त्काळ पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्यात येतील, असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.