Shashi Tharoor : केंद्रीय अर्थसंकल्पाला फिका आणि वाया गेलेली संधी असे संबोधत काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी मंगळवारी लोकसभेत सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. हा अर्थसंकल्प म्हणजे अपघात होत असलेल्या गाडीतील एअरबॅग पुन्हा बसविण्यासारखा असून, प्रवाशांना गाडीची चेसिस मजबूत आहे असे आश्वासन देण्याचा प्रयत्न असल्याची उपमा त्यांनी दिली. अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करताना थरूर (Shashi Tharoor) यांनी मिर्झा गालिब यांच्या ‘दिल को खुश रखने को ये खयाल अच्छा है’ या शेरचा उल्लेख करत सरकारच्या दाव्यांवर खरपूस टीका केली. अर्थसंकल्पातील मुख्य कमकुवतपणा अंमलबजावणीत असून, घोषणा मोठ्या आणि आकर्षक असल्या तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अपुरी असल्याचे त्यांनी सांगितले. शेती क्षेत्रातील आश्वासनांवर टीका करताना थरूर म्हणाले की, या घोषणा म्हणजे आधुनिक प्रणयासारख्या आहेत, जसे की वचने आहेत, पण बांधिलकी नाही. सरकारचे धोरण म्हणजे हेडलाईन मॅनेजमेंट असून, खर्चाच्या बाबतीत मोठ्या घोषणा आणि प्रत्यक्ष परिणाम यांत मोठी दरी असल्याचा आरोप त्यांनी केला. Shashi Tharoor कल्याणकारी योजनांसाठी मोठ्या तरतुदी असूनही निधीचा वापर कमी असल्याचे उदाहरण देत त्यांनी जल जीवन मिशन, पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया आणि अनुसूचित जातींसाठीच्या योजनांतील अत्यल्प खर्चाचा उल्लेख केला. बेरोजगारी, वाढती महागाई आणि विषमता याकडे अर्थसंकल्पाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. ‘विकसित भारत २०४७’ ही महत्त्वाकांक्षा प्रशंसनीय असली तरी, हा अर्थसंकल्प त्या दिशेने जाण्यासाठी ठोस मार्ग दाखवत नाही, असे थरूर म्हणाले. घोषणा नव्हे तर शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचणारी योजनांची अंमलबजावणीच खऱ्या अर्थाने विकसित भारत घडवू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.