“शरद पवारांनी आडनाव बदलून ‘आगलावे’ ठेवावे”; सदाभाऊ खोत यांची खोचक टीका

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर खोचक पद्धतीने टीका केली आहे. यावेळी खोत यांनी “शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचे काम केले, त्यामुळे त्यांचे आडनाव बदलून आगलावे ठेवावे” असे म्हटले आहे. सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यासंबंधी बोलताना खोत यांनी शरद पवारांवर ही टीका केली.
सदाभाऊ खोत हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत त्यावेळी बोलत असताना त्यांनी, “शरद पवार हे महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केले नाही. जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचं. त्यांचं सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेले आहे. त्यामुळे त्यांनी पवार हे आडनाव बदलून ‘आगलावे’ करावं. हे राज्य होरपळून निघालं असून आता थांबलं पाहिजे,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
सदाभाऊ खोत यांनी यावेळी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीतील मातोश्री उल्लेखावरुनहीराज्यातील आघाडी सरकारवर टीका केली आहे. “आईला काही उपहार दिलं असेल तर ते आम्ही डायरीत लिहून ठेवत नाही. आईचे अनंत उपकार असतात, त्यामुळे आईला काही दिलं तर ते डायरीत कोणी लिहून ठेवत नाही. पण आई वसुलदार असेल तर मात्र लिहून ठेवले जाते. नामकरण झालेल्या मातोश्रींवर उपकार केलेले मात्रं लिहून ठेवले जातात. आई ही वसुली अधिकारी नसते मात्रं जिथं वसुली होते तिथं मात्र लिहून ठेवले जाते,” असेही सदाभाऊ खोत म्हणाले.





