शरद पवार म्हणाले,’सैन्यदलातील प्रमुखांचे एकमत नसताना संरक्षण मंत्री म्हणून मी निर्णय घेतला अन् सैन्यात मुलींना स्थान दिले’

SHARAD PAWAR । सांगलीच्या कवठे महांकाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनेक मुद्दयांवर भाष्य केलं. सैन्यात 18 टक्के मुलींना स्थान दिले असल्याचे मत त्यांनी मांडले.
शरद पवार म्हणाले,’ मी संरक्षण मंत्री असताना एकदा मी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी माझ्यासमोर सैन्यातील मुलींच्या तुकडीने परेड केली होती. तो सोहळा आटपून मी परत भारतात आल्यानंतर तिन्ही दलाच्या प्रमुखांना याबाबत कल्पाना दिली होती. मात्र चर्चे दरम्यान तिन्ही दलाच्या प्रमुखांचे याबाबत एकमत झाले नाही आणि ते मानायला देखील तयार नव्हते. मात्र असे असतानाही शेवटी मी याबाबत निर्णय घेतला आणि सैन्यात 18 टक्के मुलींना स्थान दिले’ असं म्हणत त्यांनी आपले मत मांडले.
महिलांच्या प्रश्नांवर बोलतांना शरद पवार म्हणाले,’दिलेल्या कामावर अधिक लक्ष घालून जर काम केलं तर प्रत्येक जबाबदारी महिला लक्ष देऊन पार पाडत असतात. महिलांनी जर दुधाचे पातेलं गॅसवर ठेवलं तर ते उतू जाऊ नये यासाठी त्या लक्ष देऊन काळजी घेत असतात. तशाच पद्धतीने महिलांना दिलेली जबाबदारी त्या जातीने लक्ष देऊन पार पाडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतांना शरद पवार म्हणाले,’सध्या घडीला मी महाराष्ट्रात दौरा करत आहे. दरम्यान, गावागावात फिरतो आहे. तरुणांच्या, शेतकरी कष्टकऱ्यांच्या भेटी घेतो आहे. राज्यात आणि देशात सत्तांतर करण्याचे जनमत तयार झाले आहे. पंतप्रधान म्हणून मोदींचे राज्य आलं आहे. मात्र गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आखल्या गेलेली धोरण लक्षात घेतली तर ती किती देशाच्या आणि कोणत्या राज्याच्या हिताची होती हे चित्र आज पुढे आहे. सत्ता हातात आल्यानंतर ती निर्णयांच्या जोरावर राबवायची असते. सत्ता ही कधीही डोक्यात जाऊ द्यायची नसते. मात्र आज आम्ही लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बघत होतो की ही सत्ता राज्यात काहींच्या आणि दिल्ली नेतृत्वाच्या डोक्यात गेली होती.





