Shambhuraj Desai – पुस्तक हे माणसाच्या विचारविश्वाला समृद्ध करणारे सर्वात प्रभावी साधन आहे, असे सांगून जिल्ह्यात वाचन चळवळ बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सातारा यांच्यावतीने आयोजित ग्रंथोत्सवांतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचा समारोप नाडे येथील कृष्ण लीला गार्डन मंगल कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. पालकमंत्री देसाई म्हणाले, समाजामध्ये ज्ञानाची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आणि युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अशा ग्रंथोत्सवांचे आयोजन अत्यंत आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यात वाचन संस्कृती अधिक बळकट व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातील. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या ग्रंथोत्सवाचे ग्रंथ प्रदर्शन ३० मार्च २०२६ पासून मोठ्या उत्साहात सुरू झाले होते. या प्रदर्शनात विविध नामांकित प्रकाशन संस्थांची शैक्षणिक, साहित्यिक, ऐतिहासिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तसेच विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके मांडण्यात आली होती. विद्यार्थ्यांसह शिक्षक, वाचनप्रेमी आणि नागरिकांनी या ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने भेट दिली. या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी, स्थानिक मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, वाचनप्रेमी नागरिक तसेच ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.