“शंभर कलाकारांच्या तमाशाला दोन लाख देत नाहीत पण दुसरीकडे गौतमी…’; रघुवीर खेडकर यांनी बोलून दाखवली मनातील खंत

मुंबई – ‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या लावणीमुळे धुमाकूळ घालत संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील हिची लोकप्रियता दिवसेंदिवस आणखीच वाढत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गौतमीची प्रसिद्धी इतकी जास्त वाढली आहे की, अनेक जण तिच्यावर भाष्य करताना दिसून येतात.
अश्यातच, ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी देखील सध्याच्या लोककलेच्या स्थितीवर परखड भाष्य केलं आहे. रघुवीर खेडकर हे अहमदनगरमधील श्रीगोंदा येथे बोलत होते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी, तिच्या कार्यक्रमासाठी दिलं जाणारं मानधन आणि तमाशा कलावंतांना दिल्या जाणाऱ्या मानधनावर रघुवीर खेडकर यांनी बोट ठेवलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, “बऱ्याच गावचे लोकं शंभर कलावंत असणाऱ्या तमाशाला दोन लाख रुपये द्यायला तयार होत नाहीत. चार पोरी आणि पाचवी गौतमी पाटीलला पाच-पाच लाख रुपये देतात हे काय आहे? कलेची गौतमी पाटील करु नका, लोककला आहे ती लोककला राहिलीच पाहिजे. लोककला जपली पाहिजे’, असं रघुवीर खेडकर यावेळी म्हणाले.
गौतमी पाटीलच्या मानधनाबद्दल इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणाले होते वाचा…
इंदुरीकर महाराज म्हणाले होते, “कीर्तनकारांनी 5 हजार रुपये मागितले तर काय खरं आहे त्यांचं, असं म्हणतात. पण तिकडे तीन लाखाला तीनच गाणी ऐकतात आणि 300 पोरांच्या चडड्या फाटतात. 200 पोरांचे गुडघे फुटतात. शेतकरी तुम्ही बोलयाचे नाही.
आम्ही रस्त्यावर कीर्तन करतो. आमचं जीवन वाऱ्यावर. आम्हाला काय संरक्षण आहे? आम्हाला विमा नाही. जे जे लोक खरं काम करतात त्यांचा भोंग्या करायचा. तुम्ही बधिर आहे, म्हणून चाललंय सगळं. मी गेल्यावर कळेल तुम्हाला हा काय बोलत होता..’ असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते.





