मुंबई -ऍल्युमिनियम उत्पादका समोर कोळसा टंचाईचा गंभीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या क्षेत्राकडे फक्त 3 दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. उत्पादन अबाधित ठेवण्यासाठी अल्युमिनियम उद्योगाला किमान 15 दिवसांचा कोळसा आवश्यक असतो.
या उद्योगाने सरकारकडे ताबडतोब हस्तक्षेपाची मागणी केली आहे. ऍल्युमिनियम असोसिएशन ऑफ इंडियाने या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही प्रमाणात कोळसा उपलब्ध झाला तरी तो वाहून आणण्यासाठी रेल्वेच्या गाड्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे आमच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
या संघटनेने कोळसा सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, ऑगस्ट 2021 पासून या क्षेत्राला कोळशाची टंचाई जाणवत आहे. अपेक्षेपेक्षा 50 टक्के कमी कोळसा उपलब्ध होत आहे. ऍल्युमिनियम हा अनेक क्षेत्रात कच्चा माल असतो. त्यामुळे ऍल्युमिनियमचे उत्पादन पुरेसे झाले नाही तर इतर क्षेत्रावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. रेल्वेचे कोळश्यासाठीचे डब्बे वीज निर्माण करणाऱ्या कंपन्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
त्यामुळे सहा हजार डब्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. जर हा प्रश्न लवकर सुटला नाही तर ऍल्युमिनियम उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. अशा अवस्थेमध्ये हा उद्योग पुन्हा पुन्हा सुरू करण्यास कठीण जाणार आहे. या उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक असते. त्याचबरोबर कुशल कामगारांची आवश्यकता असते. यासाठी हा प्रश्न शक्य तितक्या लवकर सोडवावा असे कोळसा सचिवांना ऍल्युमिनियम उत्पादकाकडून सांगण्यात आले आहे.