Tukaram Mundhe : पेढे खाल्ले आणि सात जण रुग्णालयात; पुण्यातील धक्कादायक घटना, तुकाराम मुंढेंनी घेतली दखल थेट…
Tukaram Mundhe : पुण्यातील एका कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणाला अचानक गंभीर वळण लागले आहे. नवीन वाहन खरेदीचा आनंद साजरा करण्यासाठी वाटण्यात आलेले पेढे खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील स्वारगेट परिसरात शनिवारी मोठी धडक कारवाई करण्यात आली. स्वारगेट बस स्थानक आणि परिसरातील हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या तसेच विविध विक्री केंद्रांवर अचानक छापे टाकण्यात आल्याने विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
या अचानक पडलेल्या धाडीमुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. अशातच पुण्यात एक अशी घटना घडली आहे, ज्याची चर्चा राज्यभरात होत आहे. नेमकी ती घटना काय होती आणि तुकाराम मुंढे यांनी काय आदेश दिले हे जाणून घेऊयात…
पुण्यातील एका कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणाला अचानक गंभीर वळण लागले आहे. नवीन वाहन खरेदीचा आनंद साजरा करण्यासाठी वाटण्यात आलेले पेढे खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. बाधितांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वाहन खरेदी केल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये पेढ्यांचे वाटप करण्यात आले होते. मात्र, हे पेढे खाल्ल्यानंतर काही तासांतच अनेकांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला. प्रकृती खालावत गेल्याने सात जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा : Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा एकनिष्ठ खासदार सोडणार साथ? ‘त्या’ निकालावर गणित ठरणार असल्याची चर्चा
अंतिम अहवाल आल्यानंतर नेमकं कारण काय हे समजणार
या घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि अन्न सुरक्षा विभागाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. संबंधित मिठाई दुकानातून पेढ्यांचे नमुने जप्त करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात अन्नपदार्थाच्या गुणवत्तेमधील त्रुटी किंवा साठवणुकीतील निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अंतिम अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांवरील तपासणी अधिक कडक होण्याची शक्यता
या घटनेची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, राज्यभर सुरू असलेल्या अन्नभेसळविरोधी मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणी धाडी टाकून निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त करण्यात येत आहेत. या घटनेनंतर मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांवरील तपासणी अधिक कडक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तज्ज्ञांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन
तज्ज्ञांनी नागरिकांना मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना उत्पादन तारीख, साठवणुकीची स्थिती आणि दुकानातील स्वच्छता तपासण्याचे आवाहन केले आहे. अन्नपदार्थांचा वास, चव किंवा रंग संशयास्पद वाटल्यास ते खाणे टाळावे. अन्नविषबाधेची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेऊन संबंधित प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
हेही वाचा : Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाने बदललं नाव! चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण






