Satara: राज्य शिक्षण विभागाने शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामधील गुणदानामध्ये मोठा गफला झाला असून मोठ्या रकमेचे बक्षीस संगनमताने आपापसात लाटण्याचा सावळा गोंधळ झाल्याचा आरोप म्हसवडच्या कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळाचे अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी केला आहे. याबाबत साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बाबर म्हणाले, खाजगी व्यवस्थापन शाळा गटात जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन भिन्न तपासणी पथकापैकी एका पथकाने दुय्यम शाळांना अवास्तव व ज्यादा गुण दिल्याने क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड या आपल्या शाळेवर अन्याय झालाआहे. या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी जिल्हा समिती अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्याकडे लेखी मागणी करून सुद्धा त्यांनी चौकशी व फेर मूल्यांकनासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप विश्वंभर बाबर यांनी केला आहे. या प्रकारातील ज्यादा गुण देणारे पथक कोणते व त्यातील अधिकारी कोण ? तसेच त्यांच्या कार्यक्रमाला बद्दल शंका निर्माण झाली आहे.या या तपासणीत दर्जेदार शाळेवर अन्याय तर दुय्यम शाळेला जादा गुण दिल्यामुळे तपासणी पथकातील प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर शंका निर्माण झालेली आहे. तपासणी अधिकाऱ्याच्या मनमानीपणामुळे व भ्रष्ट प्रवृत्तीमुळे शासनाची एक चांगली योजना बदनाम होत असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. सध्या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. सातारा जिल्हास्तरावर 11 तालुक्यातून शासकीय विभागातील क्रमांक एकच्या 11 व खाजगी व्यवस्थापनाच्या 11 शाळा जिल्हास्तरावर गुणदानाद्वारे निवडण्यात आल्या. वरील दोन्ही गटाच्या शाळांचे गुणदान एका पथकाऐवजी दोन भिन्न पथकाद्वारे करण्यात आले. प्रामुख्याने खाजगी व्यवस्थापन शाळा गटात अधिकाऱ्यांनी गुणदानात मोठा दुजाभाव केलेला आहे. दोन पैकी एका पथकाने सढळ हाताने व गैरमार्गाने कोणताही पुरावा न पाहता गुणदान केले तर दुसऱ्या पथकाने अत्यंत काटेकोर गुणदान केले. प्रथम क्रमांक शाळेला 11 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 5 लाख तर तृतीय क्रमांक साठी 3 लाख रुपयाचे बक्षीस असल्याने संगनमताने अधिकराच्या भ्रष्टाचाराला व गैरमार्गाला मोठा वाव मिळालेला आहे. शाळेचे गुणदान ऑफलाइन व ऑनलाइन व सक्षम पुराव्यानिशी गुणदान करण्याचे धोरण असताना सुद्धा तपासणी पथकातील अधिकाऱ्यांनी कोणतीही गुणवत्ता पडताळणी न करता, कागदोपत्री पुरावा न पाहता, डोळे झाकून दुय्यम शाळांना ज्यादा गुण दिल्याने खऱ्या दर्जात्मक शाळेवर अन्याय झाल्याचा आरोप विश्वंभर बाबर यांनी केला आहे. या स्पर्धेतील खाजगी व्यवस्थापन गटातील क्रमांक एकची शाळा विभागासाठी पाठवली. मात्र, दुसरा व तिसरा क्रमांक आज अखेर जाहीर केलेला नाही. गोपनीय सूत्रानुसार एकाच पथकाने तपासणी केलेल्या एकाच विभागातील शाळांचे सर्व नंबर गैरमार्गाने काढलेले आहेत. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळा म्हसवड या शाळेने गतवर्षी जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकविला होता. केवळ दोन गुणांनी शाळेचा पहिला क्रमांक गेला होता. क्रांतिवीर शाळा व्यवस्थापनाने यावर्षी भक्कम तयारी केली होती ती केवळ प्रथम क्रमांकासाठी केली होती. मात्र अधिकाऱ्याच्या भोंगळ गैरकारभाराचा व अयोग्य गुणदानाचा फटका या शाळेला बसला आहे. एकंदरीत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या खाजगी व्यवस्थापन प्रवर्ग गटात गैर गुणदान प्रक्रियेमुळे तसेच अधिकाऱ्याच्या संगणमतामुळे जिल्हास्तरीय विश्वासहारतेचा व रास्त गुणदानाचा फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे. खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांचे फेर मूल्यांकन करा या उपक्रमाबाबत विश्वंभर बाबर यांनी शंका व्यक्त केली केली असून एकूणच हे प्रकरण एवढ्यावर न सोडता शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण मंत्री तसेच मुख्य आयुक्त मंत्रालय मुंबई यांच्याकडे हे लावून धरणार असल्याचे सांगितले. जिल्हास्तरावर खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांचे फेर मूल्यांकन करावे, अशीही मागणी विश्वंभर बाबर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.