प्रभात वृत्तसेवा सातारा – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी) बीएस ६ प्रकारातील बसेसचा घाटांमध्ये आठवडाभरात तीन वेळा ब्रेकफेल झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत एस.टी प्रशासन खडबडून जागे झाले असून कंपनीच्या गाड्यांची फेरतपासणी सुरु केली आहे. जिल्ह्यात विविध डेपो अशा प्रकारातील ४६ एस.टी असून या एस.टीं’ची पूर्णपणे तपासणी केल्यानंतर बीएस ६ प्रकारातील एस.टी मार्गावर संचलनात पाठविण्याचा निर्णय एस.टी प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान याबाबत प्रशासनाने गंभीरपणे दखल घेऊन जिल्ह्यातील ४६ बसची टाटा कंपनीच्या पथकाकडून फेरतपासणी सुरु केली आहे.ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाणाऱ्या एस.टी’ने सर्वसामान्य प्रवासी प्रवास करतात. मात्र, गेल्या काही दिवसात याच प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मागील काही दिवसात बीएस ६ प्रकारातील एसटी’च्या ब्रेकफेलच्या घटना घडल्या. परंतु, चालकांच्या प्रसंगावधाने प्रवाशांचा जीव वाचला. या गाड्या गेल्या काही वर्षात सातारा विभागात दाखल झाल्या असून त्या टाटा कंपनीच्या आहेत. प्रेशर पाईप फुटल्याने ब्रेकफेलच्या घटना घडल्याचा निष्कर्ष प्राथमिक स्तरावर काढण्यात आला आहे.सात ते आठ वर्षापूर्वी जुन्या एस. टी चालविण्यासाठी चालकांना विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, आता बी. एस.६ व ईलेक्ट्रिक बसेस चालविण्यासाठी चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये सुरुवातीला केपीटीएल’च्या बस आहेत त्यामधील यंत्रणा समजून घेण्यासाठी दहा किलोमीटर ट्रायल बेसवर एस.टी चालवून संपूर्ण यंत्रणा समजून सांगत प्रशिक्षण दिले जात असल्याचे एस.टी प्रशासनाने सांगितले.राष्ट्रीय महामार्ग, राज्य व जिल्ह्याअंतर्गत मार्गावर एस.टी बसचा अपघात झाल्यानंतर त्यांना तत्काळ एस.टी प्रशासनाकडून मिळत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांचा देखील खोळंबा होत आहे. अनेकदा दिवस-दिवस चालकांना अपघातग्रस्त अथवा बंद पडलेल्या बसजवळ थांबावे लागत आहे. त्यामुळे अशा प्रसंगी स्थानिक डेपोकडून मदत मिळणे अपेक्षित आहे.याबाबत एस.टी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करुनच गाड्या मार्गावर आणणे योग्य ठरेल. अन्यथा एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदारी एस.टी महामंडळाची राहणार आहे. आठवडाभरात ब्रेकफेलच्या तीन घटना गेल्या आठवड्यात २८ नोव्हेंबरला खंबाटकी घाटात स्वारगेटवरुन साताऱ्याकडे येणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाला. ३० नोव्हेंबरला कास बामणोली घाटात ब्रेकची प्रेशर पाईप फुटल्याने ब्रेक लागत नव्हता. त्यानंतर तारळे-दुसाळे मार्गावरील रस्त्यावर ब्रेकफेलची घटना घडली. चालकांनी प्रसंगावधान दाखवून बस कंट्रोल केल्याने अनर्थ टळला. मात्र, आठवडाभरात अशा गंभीर घटना घडल्याने प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. महामंडळाने ही बाब गांभिर्याने घेतली असून यापुढे बीएस ६ बसेसचे काय होणार हे पाहावे लागणार आहे.