Satara School : ९० शिक्षकांची फौज, १८ शाळा, पण विद्यार्थी का घटले? पालिकेच्या शाळांसमोर अस्तित्वाचे संकट
Satara School : २००९ मधील ३० टक्के पटवाढीचा सुवर्णकाळ इतिहास जमा; डिजिटल सुविधा आणि नियोजनाच्या अभावामुळे विद्यार्थी पुन्हा खासगी शाळांकडे.

Satara School – नगरपालिका शिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील १८ शाळांमध्ये सध्या सुमारे १७५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खासगी शाळांच्या वाढत्या स्पर्धेमुळे पालिकेच्या शाळांपुढे पटसंख्या टिकवणे आणि वाढवणे हे मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे केवळ इमारतींची दुरुस्ती नव्हे, तर शिक्षणाचा दर्जा, आधुनिक सुविधा आणि पालकांचा विश्वास जिंकण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पालिकेकडे तब्बल ९० शिक्षकांची फौज असतानाही अपेक्षित प्रमाणात विद्यार्थी संख्या वाढताना दिसत नाही. अनेक शाळांमध्ये अनुभवी शिक्षक असूनही नियोजनाचा अभाव, आधुनिक उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी न होणे आणि पालकांपर्यंत प्रभावी संवाद न पोहोचणे ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. २००९ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले आणि उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर यांनी ‘चिमण्यांनो परत फिरा’ हा उपक्रम राबवून पालिकेच्या बालिका शाळांमध्ये तब्बल ३० टक्के पटवाढ साधली होती.
घराघरांत जाऊन पालकांशी संवाद, विद्यार्थ्यांसाठी आकर्षक उपक्रम आणि शाळांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले होते. या उपक्रमाची त्या काळात राज्यभर दखल घेण्यात आली होती. सध्या नवनिर्वाचित शिक्षण मंडळ सभापती शंकर किर्दत यांच्यापुढेही अशाच प्रकारचे मोठे आव्हान उभे आहे. डिजिटल शिक्षण, इंग्रजी माध्यमाचा प्रभाव आणि खासगी शाळांची आक्रमक मार्केटिंग यामुळे पालिका शाळांना नवीन ओळख निर्माण करावी लागणार आहे.
पालिकेच्या शाळांमध्ये क्रीडा, संगणक शिक्षण, ई- लर्निंग, स्वच्छता आणि सुरक्षितता यांसारख्या सुविधा अधिक सक्षम करण्याची अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. शिक्षण मंडळाने काही वर्षांपूर्वी सेमी इंग्रजीचा उपक्रम सुरू केला होता. सुरुवातीला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, योग्य समन्वय, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सातत्यपूर्ण नियोजनाच्या अभावामुळे हा उपक्रम टिकू शकला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल पुन्हा खासगी शाळांकडे वळल्याचे दिसून आले.
कृती आराखड्याची गरज
पालिका शाळांबाबत समाजात सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा लोकसहभागावर आधारित मोहीम राबवण्याची गरज व्यक्त होत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिल्यास पालिका शाळांमध्ये नव्याने विश्वास निर्माण होऊ शकतो. शिक्षण मंडळाने यासाठी दीर्घकालीन कृती आराखडा तयार करून शिक्षक, पालक आणि सामाजिक संस्थांचा समन्वय साधणे काळाची गरज मानली जात आहे.






