Satara: समर्थ मंदिर परिसराने घेतला मोकळा श्वास; अतिक्रमण मोहिमेत चौकातील पक्की बांधकामे हटवल्याने रस्ता झाला रुंद
Satara समर्थ मंदिर चौक ते बोगदा हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि कायम वर्दळीचा मार्ग मानला जातो. कास पठार आणि सज्जनगडकडे जाणारा हा रस्ता असल्यामुळे रहदारी मोठी असून अरुंद रस्ता, दोन्ही बाजूंना वाढलेली अतिक्रमणे आणि अनियंत्रित पार्किंगमुळे येथे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

Satara: शहरातील वाहतूक कोंडीने त्रस्त राहिलेल्या समर्थ मंदिर परिसराने अखेर मोकळा श्वास घेतला. नगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्या दिवशीही कडक पोलीस बंदोबस्तात धडाक्यात सुरू राहिली. चौकातील पक्की बांधकामे हटवल्यामुळे रस्त्याची रुंदी मोठ्या प्रमाणात वाढली असून भविष्यात या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
समर्थ मंदिर चौक ते बोगदा हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि कायम वर्दळीचा मार्ग मानला जातो. कास पठार आणि सज्जनगडकडे जाणारा हा रस्ता असल्यामुळे रहदारी मोठी असून अरुंद रस्ता, दोन्ही बाजूंना वाढलेली अतिक्रमणे आणि अनियंत्रित पार्किंगमुळे येथे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेने रस्ता रुंदीकरण आणि अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे.
दुसऱ्या दिवशीच्या कारवाईदरम्यान अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली सातारा नगरपालिकेचे सुमारे १५ ते २० कर्मचारी, जेसीबी व बुलडोझर यंत्रणा तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होते. समर्थ मंदिर चौकातील वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. वाहनांची वाहतूक होलार वस्ती मार्गे वळवण्यात आल्याने परिसरात शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते.
पालिकेकडून पहिल्या दिवशी सुमारे सात पक्की बांधकामे हटवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशीही सात ते आठ पक्क्या बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला. समर्थ मंदिर चौकातील गणपती मंदिरालगतचा काही भाग तसेच पाठीमागील अतिक्रमित बांधकामे हटवून संपूर्ण चौक अधिक प्रशस्त करण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासून अरुंद झालेला हा चौक आता खुला आणि मोठा दिसू लागला आहे.
पालिकेच्या या कारवाईमुळे समर्थ मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून भविष्यात शहरातील इतर अतिक्रमित भागांमध्येही अशाच प्रकारच्या मोहिमा राबविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य केल्यास शहर विकासाची कामे अधिक वेगाने पूर्ण होतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद
विशेष म्हणजे या मोहिमेला स्थानिक नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बोगदा परिसरातील काही रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमित बांधकामे उतरवण्यास सुरुवात केली आहेत. रस्त्याच्या मधोमध साडेसात मीटर अंतर कायम ठेवत दुतर्फा बांधकामे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येथील रहिवासी रवी माने आणि महेश पाटील यांनी पालिकेच्या कारवाईला सहकार्य दर्शवत शहर विकासासाठी ही मोहीम आवश्यक असल्याचे सांगितले. ‘सातारा शहराच्या विकासासाठी आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्ते रुंद होणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही नगरपालिकेला सहकार्य करत आहोत,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.





