Satara News: पालिकेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! सोमवारी सकाळी ‘या’ भागात चालणार बुलडोझर; पाहा संपूर्ण प्लॅन
Satara News: विद्यार्थी, रुग्ण आणि पादचाऱ्यांची होणारी अडचण थांबवण्यासाठी प्रशासनाचा इशारा; अडथळे स्वतःहून हटवण्याचे पालिका प्रशासनाचे आवाहन.

Satara News – गोडोली परिसरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीला जबाबदार ठरणार्या अतिक्रमणांवर अखेर सातारा नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवार, दि. 10 ऑगस्टपासून गोडोली परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येणार असून, रस्ते आणि सार्वजनिक जागा अडवून बसलेल्या अतिक्रमणांवर थेट कारवाई केली जाणार आहे.
साईबाबा मंदिर परिसर गोडोली नाका तसेच सदरबाजार कॅम्प परिसर मार्गाची नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष अडवोकेट दत्ता बनकर मुख्याधिकारी विनोद जळगाव यांनी पाहणी केली. वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या गोडोलीकरांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पोवई नाका ते साईबाबा मंदिर तसेच गोडोली जकात नाका परिसरात रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.
त्यातच पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्गावरील वाहतुकीचा ताण गोडोली चौकावर वाढला आहे. परिणामी सकाळ-संध्याकाळ या भागात वाहनांच्या रांगा लागत असून, नागरिकांना अक्षरशः वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गोडोली परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच मोठ्या प्रमाणावर व्यापारी आस्थापना आहेत.
त्यामुळे या मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या कडेला वाढलेली अतिक्रमणे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे उपलब्ध रस्त्याची रुंदीच कमी होत असल्याचे चित्र आहे. याचा फटका विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, वाहनचालक आणि पादचार्यांना बसत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सातारा नगरपालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकार्यांनी शनिवारी गोडोली परिसराची पाहणी केली.
पाहणीदरम्यान वाहतूक कोंडीची कारणे, रस्त्यावरील अतिक्रमणे आणि वाहतुकीला निर्माण होणारे अडथळे यांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ तात्पुरती कारवाई न करता गोडोली परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल,
रस्त्यावरील अडथळे दूर करणे आणि उपलब्ध जागेचा योग्य वापर करण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारची कारवाई केवळ अतिक्रमणे हटविण्यापुरती मर्यादित न राहता वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
अतिक्रमणधारकांना प्रशासनाचा इशारा
रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा अडवून केलेली अतिक्रमणे वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत असल्याने संबंधित नागरिक आणि व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कारवाईच्या वेळी अडथळे निर्माण न करता स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे.






