Satara News : पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

कोयनानगर : पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त ५४६ पैकी ४७४ कुटुंबांना १५१ तात्पुरत्या निवारा शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या रखडलेल्या कामांबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला कडक ताकीद दिली. “गरजू कुटुंबांना सन्माननीय आणि सुरक्षित निवारा मिळेपर्यंत विश्रांती नाही,” असा शासनाचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पाटण तालुक्यातील बैठकीत विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक निलेश गहने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे उपस्थित होते.
धावडे (७९), काहीर (३७), आंबेघर (३०), गोकुळ तर्फ (८), चाफेर (१०२) येथील मंजूर घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करून लाभार्थ्यांचे स्थलांतर करावे, असे निर्देश देसाई यांनी दिले. देशमुखवाडी येथील १९२ घरकुलांची कामे पावसाळ्यानंतर त्वरित सुरू करावीत आणि मोडकवाडी येथील ८८ घरकुलांसाठी जागेची पाहणी लवकर पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.
पापर्डे आणि येराड येथील जल पर्यटन प्रकल्पांसाठी मंजूर निधीच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी आणि अडथळे दूर करावेत, अशा सूचना देसाई यांनी केल्या. तसेच, कराड-चिपळूण मार्गावरील म्हावशी फाटा ते संगम धक्का रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे आणि अतिक्रमणे तातडीने हटवावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाटोळे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्राचे काम गतिमान करून ते लवकर कार्यान्वित करावे, असेही ते म्हणाले. “पुनर्वसन हे माणुसकीचे आणि विकासाचे महत्त्वाचे काम आहे. दरडग्रस्तांना सन्मानासह नवजीवन देण्यासाठी कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही,” असे पालकमंत्री देसाई यांनी ठणकावले.





