Satara News : दुष्काळी पट्ट्यासाठी वरदान! कृष्णा खोऱ्यातील पाणी नीरामार्गे उजनीत वळवणार; राज्य सरकारकडून मंजुरी
कृष्णा नदीचे पाणी नीरामार्गे उजनी धरणात वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा (डीपीआर) तयार (Satara News) करण्यासाठी २४ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली असून सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यांतील दुष्काळी भागांना कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची आशा पल्लवीत झाली आहे.

Satara News : कृष्णा नदीचे पाणी नीरामार्गे उजनी धरणात वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा (डीपीआर) तयार (Satara News) करण्यासाठी २४ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली असून सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यांतील दुष्काळी भागांना कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची आशा पल्लवीत झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यांच्या वाढदिवसा दिवशीच दुष्काळी भागातील जनतेला मोलाची भेट दिली आहे. हा निर्णय भविष्यात सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यांसह संपूर्ण दुष्काळी पट्ट्यासाठी वरदान (Satara News) ठरणार आहे. आम्ही प्रयत्न केले व सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मोठे यश मिळाले आहे. दुष्काळी भागाला मुख्यमंत्र्यांच्या रुपाने जणू विठ्ठलचं पावला आहे, असे माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रणजितसिंह म्हणाले, “कृष्णा खोरे पाणी तंटा लवाद १ मधील महाराष्ट्राच्या वाट्याच्या पाण्याचा परिपूर्ण वापर करण्यासाठी कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन आराखडा, अंदाजपत्रक व सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास २४ कोटी ५ लाख ६७ हजार १२५ रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून, आमच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यश हे आले आहे.” महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने २२ जुलै रोजी शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.
या प्रकल्पांतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीतील महाराष्ट्राच्या वाट्याचे उपलब्ध पाणी नीरा नदीमार्गे उजनी धरणापर्यंत आणून दुष्काळी भागात वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सापटेवाडी बंधारा ते नीरा नदीवरील उद्धट बंधारा आणि उद्धट बंधारा ते उजनी धरण अशा दोन टप्प्यांत काम प्रस्तावित करण्यात आले आहे.
सातारा व सोलापूर जिल्ह्यातील दूष्काळी परिसरातील कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यास शासनाने आता सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. शासन निर्णयात प्रकल्पासाठी (Satara News) आवश्यक सर्व तांत्रिक मान्यता घेणे, कृष्णा पाणी तंटा लवाद १ मधील तरतुदींचे पालन करणे तसेच सर्वेक्षणाचा खर्च अर्थसंकल्पीय निधीतून करण्याच्या अटी नमूद करण्यात आल्या आहेत.
सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागांना सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघासह विस्तृत परिसरातील शेतीला मोठी चालना मिळणार असल्याचे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.
कृष्णा नदीतील उपलब्ध पाणी नियोजनबद्ध पद्धतीने नीरा नदीमार्गे उजनी धरणाकडे वळविण्याचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यास, पावसाळ्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा प्रभावी वापर करता येण्यास मदत होईल. त्यामुळे पूरस्थितीचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास हातभार लागू शकतो. त्याचबरोबर हे पाणी सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी उपयुक्त ठरणार असल्याने या तीन जिल्ह्यांतील शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि जलसाठा वाढविण्यास मोठा फायदा होणार असल्याचे रणजितसिंह यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस आमदार सचिन पाटील,ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, जिल्हा बँकेची संचालक शिवरूपराजे खर्डेकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, माणिकराव सोनवलकर,भीमराव बुरुंगले आदी उपस्थित होते.






