Satara Municipal Council: सातारा पालिकेत राडा! स्थायी समितीत जोरदार भांडण, उदयनराजे समर्थकांचा थेट वॉकआऊट
Satara Municipal Council: अण्णा भाऊ साठे जयंती खर्चाच्या चौकशीवरून आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून दोन्ही राजांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकी.

Satara Municipal Council – सातारा पालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत भाजपमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. विषयपत्रिकेवरील विषयांच्या चर्चेत बांधकाम समितीचे सभापती बाळासाहेब खंदारे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने वातावरण चांगलेच तापले. त्यांच्या वर्तनाचा निषेध करत खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थक नगरसेवकांनी सभागृहातून तासभर वॉकआऊट केला. या सभेत शेवटच्या 15 मिनिटांमध्ये तब्बल 206 विषयांना मंजुरी देण्यात आली.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी हॉलमध्ये दुपारी 12 वाजता सभा सुरू झाली. सभासचिव वर्षा पाटील या विषयपत्रिकेचे वाचन करत असताना, अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रमासाठी खरेदी करण्यात येणार्या साहित्याच्या विषयातत नगरसेविका सुजाता राजेमहाडिक यांनी काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले. त्यामुळे बांधकाम समितीचे सभापती बाळासाहेब खंदारे संतप्त झाले. आम्ही घेतलेल्या कार्यक्रमांवरच आक्षेप का, असा सवाल त्यांनी केला.
त्यानंतर खासदार उदयनराजे व मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थक नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा समितीचे सभापती अॅड. दत्ता बनकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार गटाचे नगरसेवक सभागृहातून बाहेर पडले. त्यामध्ये नियोजन समितीचे सभापती अशोक शेडगे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मोनिका घोरपडे, मागासवर्गीय विशेष कल्याण समितीचे सभापती संकेत साठे, सुजाता राजेमहाडिक यांचा समावेश होता.
यापूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बाळासाहेब खंदारे यांनी अॅड. दत्ता बनकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्या वादाची पुनरावृत्ती स्थायी समितीच्या सभेत झाल्याने सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी यांच्यातील अंतर्गत संघर्ष कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील पाणीटंचाईमध्ये पालिकेच्या टँकरने चढ्या दराने पाणीपुरवठा केला गेल्याचा आरोपही खंदारे यांनी स्थायी समिती सभेत केल्याचे समजते. त्यामुळे सभेतील वातावरण आणखी तापले.
भाजपचे गटनेते अविनाश कदम यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. वॉकआऊटमुळे सभेचे कामकाज जवळपास तासभर ठप्प झाले. त्यानंतर खासदार गटाचे सदस्य सभागृहात परतले आणि शेवटच्या अवघ्या 15 मिनिटांत तब्बल 206 विषयांना मंजुरी देण्यात आली. एवढ्या मोठ्या संख्येने विषय अल्प वेळेत मंजूर झाल्याने पालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सभा संपल्यानंतर खासदार गटाच्या नगरसेवकांनी जलमंदिर येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन, सभागृहात घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या घडामोडींमुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.






