बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आवादा एनर्जी प्रकल्पाच्या तीन वॉचमनचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यांच्या जबावातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुदर्शन घुले आपल्या साथीदारांसोबत खंडणी मागण्यासाठी आवादा कंपनीमध्ये आला होता अशी माहिती वॉचमनने दिली आहे. त्यावेळी या वॉचमनसमोरच सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी प्रकल्पावरील तीन वॉचमनचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. हा जबाब महत्त्वाचा ठरला आहे. अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे आणि भैय्यासाहेब सोनवणे हे तिघेजण आवादा एनर्जी प्रकल्पावर वॉचमन म्हणून कार्यरत होते. या ठिकाणी ड्युटीवर असताना सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासह आवादा एनर्जी प्रकल्पावर आला होता. यावेळी सुदर्शन घुलेने या तिन्ही वॉचमनला मारहाण केली होती. तसेच जातीवाचक शिवीगाळ देखील केली होती. या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा देखील नोंद आहे. आवादा एनर्जी प्रकल्पाचे मॅनेजर शिवाजी थोपटे यांना सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराने याच वॉचमन समोर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी नाही दिली तर कंपनी बंद करा अशी धमकी देखील सुदर्शन घुलेने दिली होती. हे भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख या ठिकाणी आले होते. ‘कंपनी बंद करू नका. लोकांना रोजगार मिळू द्या.’ असे सरपंच संतोष देशमुख हे सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना सांगत होते. त्यावेळी सुदर्शन घुलेने सरपंच देशमुख यांना ‘सरपंच तुला बघून घेऊ. तुला जिवंत सोडणार नाही.’, अशी धमकी दिली होती, असा जबाब वॉचमनने दिला आहे, त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. कृष्णा आंधळेला पकडणे अतिशय गरजेचे : धनंजय देशमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 98 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडणे अतिशय गरजेचे आहे. कारण त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता धनंजय देशमुख यांनी वर्तवली आहे. कृष्णा आंधळेला लवकरात लवकर पकडून जेरबंद करावे. तसेच यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे धनंजय देशमुख म्हणाले आहेत. कृष्णा आंधळेकडे जास्त पुरावे असतील. त्यामुळे तो पोलीस यंत्रणेच्या ताब्यात येण्यासाठी एवढी दिरंगाई करत आहे. तर नक्कीच त्याच्याकडे ठोस पुरावे असतील आणि त्याची चौकशी करणे गरजेची आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले आहेत.