Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: माउलींच्या स्वागतासाठी फलटणनगरी सज्ज! पालिकेने केलेल्या ‘या’ विशेष तयारीने वारकरीही सुखावणार
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा १७ जुलै रोजी फलटणमध्ये; रस्ते, पाणी, आरोग्य आणि अखंडित वीज पुरवठ्यासाठी पालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर कामे सुरू.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शनिवार, दि. 17 जुलै रोजी फलटण मुक्कामी आगमन होणार आहे. या सोहळ्यातील दिंडीकरी, वारकरी, भाविकांना सर्व प्रकारच्या सेवासुविधा प्रतिवर्षाप्रमाणे उपलब्ध करुन देण्यासाठी फलटण नगरपरिषद सज्ज झाली आहे. प्रामुख्याने रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता, वीज आणि पालखी तळावरील व्यवस्थेसाठी जय्यत तयारी सुरु आहे.
शहराचे प्रवेशद्वारी, जिंती नाका येथे माऊलींच्या आणि पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्याबरोबर जिंती नाका ते विमानतळ या शहरातून जाणार्या पालखी मार्गावरील सर्व अतिक्रमणे काढून या मार्गाची स्वच्छता करण्याबरोबरच आकर्षक पथदिवे व सुशोभीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले.
शनिवार, दि. 17 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम येथील प्रशस्त पालखी तळावर (विमानतळ) प्रतिवर्षाप्रमाणे राहणार असल्याने पालखी तळावर प्रतिवर्षाप्रमाणे माऊलींसाठी मुख्य तंबू व विश्वस्त आणि अन्य प्रमुख तंबूंसाठी विशेष व्यवस्था, दर्शन बारी, समाज आरती परिसराची कामे प्रगती पथावर असून संपूर्ण पालखी तळाची स्वच्छता, पुरेशी प्रकाश व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र तात्पुरती स्वच्छता गृहे, चौकशी व मार्गदर्शन केंद्र आणि अन्य व्यवस्था करण्यात येत आहे.
पावसामुळे पालखी तळावर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संपूर्ण पालखी तळाची स्वच्छता व पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने योग्य व्यवस्था करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी निदर्शनासन आणून दिले आहे. भाविक, वारकर्यांसाठी शहरातील प्रत्येक प्रमुख चौकात एक पाणपोईची स्वतंत्र व्यवस्था, त्याशिवाय पालखी तळ व परिसरात जादा नळकोंडाळी आणि शहरात योग्य दाबाने स्वच्छ, निर्जंतुक पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठ्याची आणि स्वच्छतेची व्यवस्था करण्यात येत आहे.
पोलीस प्रशासनाकडून पालखी सोहळ्याच्या येण्याजाण्याच्या मार्गासह संपूर्ण शहर आणि पालखी महामार्गावर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वारकर्यांचे मालवाहतूक ट्रक व अन्य वाहनांसाठी वेगळ्या मार्गाची आखणी केली जात आहे. वारकर्यांची फलटण शहरात कसलीही गैरसोय होणार नाही, यासाठी नगरपरिषद सर्वतोपरी खबरदारी घेत असल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले.
अखंड वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून उपाययोजना
महावितरण कंपनीने शहरातील सर्व वीजवाहिन्या व ट्रान्सफॉर्मर सेंटर सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने लगतच्या वृक्षांची छाटणी, शहरासह पालखी मार्गावरील वीज जनित्र, वीजेचे खांब यांना सुरक्षा कवच घालण्याचे कामाला गती आली आहे. पालखी तळाच्या (विमानतळ) चारही दिशांना विद्युत टॉवर उभारण्याचे काम सुरु असून कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी स्वतंत्र विद्युत जनित्र बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे तसेच अखंडित वीज पुरवठ्यासाठी 8 सॅटेलाइट पॉइंट, छोट्या-मोठ्या जनरेटरची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.





