Sanju Samson Statement : “मी रोबोट किंवा मशीन नाही, मलाही भावना..!”; २० चेंडूंत ५७ धावा कुटल्यानंतर संजू सॅमसनचे टीकाकारांना सडेतोड उत्तर
Sanju Samson Statement : संजू सॅमसनने सातत्याने होणाऱ्या टीकेवर मौन सोडत आता परखडपणे भाष्य केले आहे.

Sanju Samson Responds To Critics On Competition With Vaibhav Sooryavanshi : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातील अपयशानंतर टीकेचा धनी ठरलेल्या संजू सॅमसनने (Sanju Samson) मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी दुसऱ्या टी-२० सामन्यात आपल्या वादळी फलंदाजीने टीकाकारांची तोंडे बंद केली. संजूने अवघ्या २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण करत २२ चेंडूंत ५७ धावांची आक्रमक खेळी साकारली. भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संजूने बाहेरून होणाऱ्या टीकेवर आणि भारतीय संघातील वाढत्या स्पर्धेवर अत्यंत परखड भाष्य केले.
‘वाई-फाय बंद ठेवतो, पण मी रोबोट नाही’; ज्येष्ठांच्या टीकेवर संजूचे उत्तर!
माजी खेळाडू आणि समालोचकांच्या टीकेबाबत बोलताना संजू म्हणाला, “मी सहसा फोनचा वाय-फाय बंद ठेवण्याचा प्रयत्न करतो; मात्र कधी तो सुरू झाला की सिनियर खेळाडूंचे आक्षेपार्ह किंवा नकारात्मक शेरे नजरेस पडतात. मला समजते की हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. सुरुवातीला अशा गोष्टींचे नक्कीच वाईट वाटते, कारण मी काही मशीन किंवा रोबोट नाही, मलाही भावना आहेत. मात्र, आता अशा बाह्य दबावाशी कसे दोन हात करायचे याचा मला पुरेसा अनुभव आला आहे.”
टी-२० वर्ल्ड कप गाजवूनही संघातून वगळले; स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित!
Sanju Samson keeps it simple: switch off the Wi-Fi, shut out the noise and let the bat do the talking. 📵
After a blistering 57 off 22 balls against Afghanistan, Samson opened up about handling criticism and staying focused on his game. pic.twitter.com/eHa5IDJjim
— CrickBuster (@Crick_buster) September 16, 2026
संजूने स्पष्ट केले की, भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडूंवर होणाऱ्या चर्चा टाळणे अशक्य आहे; त्यामुळे स्वतःच्या विचारांवर स्पष्टता असणे गरजेचे असते. जर मी बाहेरील प्रतिक्रियांचा विचार करत बसलो, तर मैदानात मुक्तपणे अशी आक्रमक फलंदाजी करू शकणार नाही. टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरल्यानंतरही मला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात केवळ २-३ सामन्यांतील अपयशानंतर संघातून वगळण्यात आले होते, असे सांगत त्याने निवडीबाबत सकारात्मक राहणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
सलामीसाठी वैभव सूर्यवंशीशी तीव्र चुरस; स्पर्धा बनली रंजक!
भारतीय संघात सध्या सलामीच्या जागेसाठी संजू सॅमसन आणि १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. आयपीएल २०२६ मध्ये ऑरेंज कॅप जिंकून वैभव संघात आला, तर झिम्बाब्वे दौऱ्यावर संजूच्या अनुपस्थितीत तो ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ ठरला होता. आता पहिल्या सामन्यात संजू अपयशी ठरताच वैभवला संधी देण्याची मागणी होत असतानाच, संजूने २० चेंडूंत अर्धशतक ठोकत आपले स्थान पुन्हा एकदा भक्कम केले आहे.





