Sanju Samson Record : नाद करा पण संजू सॅमसनचा कुठं! रोहित-विराट अन् धोनीसह कोणत्याच खेळाडूला जमलं नाही ते करुन दाखवलं
Sanju Samson Record : संजू सॅमसन पुन्हा एकदा भारतीय संघात आपले स्थान पक्के करत असल्याचे दिसत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात अर्धशतक झळकावून त्याने अंतिम सामन्यासाठीही आपले स्थान निश्चित केले आहे.

Sanju Samson 100 Percent Win Record On 50 Plus Scores Enters Top 10 In T20Is : अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वादळी अर्धशतक ठोकत संजू सॅमसनने (Sanju Samson) केवळ भारताचा विजय साकारला नाही, तर संघातले आपले स्थानही अधिक भक्कम केले. २०२६ च्या टी-२० विश्वचषकानंतर इंग्लंड दौऱ्यातील अपयशामुळे त्याला वगळण्यात आले होते. या खेळीसह संजूने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारतासाठी सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या फलंदाजांच्या टॉप-१० यादीत दिमाखात प्रवेश केला आहे. यासह त्याने एक खास पराक्रम केला आहे, जो यापूर्वी रोहित-विराट किंवा धोनी कोणालाही जमलेला नाही.
१०व्यांदा ५०+ धावांचा टप्पा; शतप्रतिशत विजयाचा अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड!
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये संजू सॅमसनचा हा १०वा ५०+ स्कोअर (३ शतके आणि ७ अर्धशतके) ठरला. विशेष बाब म्हणजे, संजूने भारतासाठी जेव्हा जेव्हा ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत, तेव्हा तेव्हा भारताने तो सामना जिंकला आहे. संजूच्या अर्धशतकांवर टीम इंडियाचा विजयाचा स्ट्राईक रेट १०० टक्के (१० पैकी १० विजय) राहिला असून, असा १०० टक्के विजयी रेकॉर्ड विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांच्या नावावरही नाही.
कोहली-रोहितच्या पंक्तीत स्थान; श्रेयस अय्यरच्या विक्रमाशी बरोबरी!
THE STATEMENT INNINGS BY SANJU SAMSON.
– Samson hammered 57 runs in 22 balls with 259 SR. 🇮🇳 pic.twitter.com/qliIwL76yG
— Maina Singh (@Maina_Singhx77) September 15, 2026
भारतासाठी सर्वाधिक ५०+ धावांच्या विक्रमात विराट कोहली ३९ वेळा (११ पराभव) अव्वल स्थानी असून रोहित शर्मा ३७ वेळा (४ पराभव) दुसऱ्या स्थानी आहे. संजूने आता श्रेयस अय्यरच्या (१० वेळा) विक्रमाशी बरोबरी करत थेट टॉप-१० मध्ये झेप घेतली आहे. मात्र, या यादीतील इतर सर्व फलंदाजांच्या पन्नाशीनंतर भारताने किमान एकदा तरी पराभव पाहिला आहे; संजू एकमेव असा फलंदाज आहे ज्याच्या ५०+ खेळीनंतर भारताला कधीही पराभवाचे तोंड पाहावे लागले नाही.
आज तिसऱ्या टी-२० मध्ये व्हाईटवॉशची संधी; संजूवर सर्वांच्या नजरा!
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम टी-२० सामना आज, १७ सप्टेंबर रोजी दिल्लीत खेळवला जात आहे. सलग दोन सामने जिंकून भारताने मालिका आधीच खिशात घातली असून, आज अफगाणिस्तानचा व्हाईटवॉश (३-०) करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. फॉर्मात परतलेला संजू सॅमसन आज पुन्हा मोठी खेळी करून आपला हा अनोखी विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे.





