संजय राऊतांचा राष्ट्रवादीच्या आमदारावर गंभीर आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, आमदार सुनील शेळके म्हणाले…

Sanjay Raut | Sunil Shelke | उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पत्राचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी यासंदर्भात थेट कारवाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना पत्र लिहिले आहे.
या पत्राचे फोटो त्यांनी त्यांच्या एक्स सोशल मीडियाच्या माध्यामावर शेअर केले आहेत. सुनील शेळके यांनी राज्य शासनाची हजारो कोटींची रॅायल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.
भ्रष्टाचार व जनतेची फसवणूक वगैरे विषयांवर आपण नेहमीच बोलत असता. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवू असे आपले धोरण आहे. प्रत्यक्षात राज्यातले चित्र नेमके उलटे आहे. कुंपणच शेत खात असून शेत खाणाऱ्यांना सरकारचे अभय असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
संजय राऊत यांनी केलेला आरोप आमदार सुनील शेळके यांनी फेटाळून लावले आहेत. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी समोर आणावेत त्यानंतर मी याविषयी खुलासा करणार असल्याचे शेळके यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
पत्रात काय म्हटलयं?
शासनाने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळासाठी, औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक ४ येथे मावळातील गाव मौजे आंबळे आहे. या गावात व त्या शेजारी अनेक क्रशर उद्योजकांच्या खाणी आहेत. सदर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळास वापरण्यासाठी योग्य नसल्याने ते सर्व खाणीचे गट, जमिनी वगळण्यात आल्या.
तरी सुनील शेळके आपल्या आमदार पदाचा दुरुपयोग करून औद्योगिक क्षेत्रामध्ये आंबळे येथील त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या २९ हेक्टर ८६.१० आर क्षेत्रावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने शासन निर्णय (१९६१ च्या प्रकरण ६) काढून सदरच्या जमिनी संपादन करत आहेत व तसेच शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर दगड खाणींचे बेकायदेशीर उत्खनन केले आहे. शेळके यांनी कोणत्याही प्रकारची रॅायल्टी भरलेली नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.





