‘संजय राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये…’; ‘त्या’ विधावरून नाना पटोलेंनी घेतला चांगलाच समाचार

नागपूर – शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणावर खासदार संजय राऊतांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत मात्र निर्णय राहुल गांधींच घेतात असे वक्तव्य केले. दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यावर आज कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘राऊतांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही’, असा घणाघात पटोले यांनी केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप सोबत जाण्याची चूक करेल असे वाटत नाही. शरद पवार शाहू फुले आंबेडकर विचारांचे असून ते भाजप सोबत जाणार नाही असे आमचा विश्वास आहे अशा बातम्या भाजपकडून पेरल्या जाऊ शकतात. त्यामुळे राउतांनी आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या क्षमतेवर आणि गांधी कुटुंबाच्या प्रतिष्ठेबद्दल काहीही बोलू नये, असेही पटोले यांनी म्हटले आहे.
“मविआ’साठी पवार सोनियांकडे गेले…
राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप सोबत जाण्याची चूक करणार नाही. जर राष्ट्रवादी भाजप सोबत गेली तर आम्ही भाजपविरोधात लढू. भाजप विरोधात लढण्यासाठी जे आमच्या सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही पुढे जाऊ. पवार यांच्या आत्मचरित्रात महाविकास आघाडी सरकार निर्माण होत असताना कॉंग्रेसच्या भूमिकेबद्दल जे आरोप करण्यात आले आहे. त्याबद्दल योग्य वेळी उत्तर देऊ असे पटोले यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी सोनिया गांधी शरद पवार यांच्याकडे आल्या नव्हत्या. शरद पवार सोनिया गांधींकडे गेले होते. आज त्याबद्दल प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ते मोठे नेते आहे ते काहीही बोलू शकतात लिहू शकतात योग्यवेळी त्याबद्दल प्रतिक्रिया देऊ, असे नाना पटोले म्हणाले.





