मुंबई –शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरूवारी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीमागचे कारण आणि त्यांच्यातील चर्चेचा तपशील तातडीने समजू शकला नाही.
शिवसेनेतील बंडामुळे राज्यात सत्ताबदल झाला. त्या बंडात सहभागी झालेल्या आमदारांकडून प्रामुख्याने राऊत यांच्यावर निशाणा साधला जात आहे. राऊत हे शिवसेना नेत्यांपेक्षा पवार यांच्याशी अधिक जवळीक साधून असल्याचा आरोपही ते करत आहेत. बंडखोरांच्या टीकासत्रानंतर राऊत मागील काही दिवसांपासून फारसे बोलण्याचे टाळत आहेत.
पवार यांच्या भेटीनंतरही त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. त्यामुळे कुठल्या कारणावरून ती भेट झाली ते गुलदस्त्यात राहिले. राज्यात सुमारे अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्या सरकारचे शिल्पकार म्हणून पवार यांच्याकडे पाहिले गेले.
महाराष्ट्रातील मतफुटीवर काँग्रेस नेतृत्वाकडून ऍक्शन; त्या ९ आमदारांना…
संबंधित आघाडी स्थापन होण्यात राऊत यांची भूमिकाही मोलाची ठरली. त्यामुळे आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर राऊत यांना एखाद्या राजकीय हिरोसारखी ओळख मिळाली. मात्र, बंडामुळे ते सरकार कोसळल्यानंतर बंडखोरांकडून राऊत यांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते.
उपसभापती नीलम गोऱ्हेंचा जखमी वारकऱ्यांना दिलासा; विचारपूस करत केली आर्थिक मदत