मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनाम द्यावा लागला. राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठका घेऊन मोठे निर्णय घेतले होते. त्यात औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता.
या मंत्रीमंडळ बैठकीत महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी निर्णयाला मंजुरी दिली होती. या निर्णयाला त्यावेळी केवळ एमआयएम पक्षाने तिव्र विरोध केला होता. तसेच, कॉंग्रेसही या निर्णयाला विरोध करेल असेही बोलले जात होते. मात्र, कॉंग्रेसकडून त्यावेळी तशी कोणतीही प्रतिक्रीया आली नव्हती. मात्र, आता महाविकास आघाडी सरकार कोसळून एकनाथ शिंदे सरकार अस्तित्वात आले आहे.
या सर्व घडामोडी घडून 17 दिवसांच्यावर कालावधी लोटला आहे. त्यानंतर कॉंग्रेसकडून प्रतिक्रीया आली असून नामांतराच्या निर्णयावर कॉंग्रेस हायकमांड नाराज असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान म्हणाले, कॉंग्रेस पक्षाला संभाजी महाराज यांचा अभिमान आहे. मात्र, शिवसेनेने निर्णय घेताना कॉंग्रेसला विश्वासात घ्यायला हवे होते.
2019 मध्ये भाजपला बाजूला सारण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्तीने सरकार स्थापन झाले. त्यावेळी कॉंग्रेसेने आपले बाकीचे सर्व विषय बाजूला ठेवून शिवसेनेला समर्थन दिले. तसेच, कॉंग्रेस हायकमांडनेही या निर्णयाला मंजुरी दिली. त्यानंतर लेखी किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. शिवसेनेने नामांतराचा निर्णय घेताना विश्वासात घ्यायला हवे होते. तसेच, चर्चा करायला हवी होती. हे सरकार तीनही पक्षांचे होते लोकशाही पद्धतीने चर्चा करायला हवी होती, असे नसीम खान म्हणाले.
तसेच कॉंग्रेस पक्षाची एक विचारधारा आहे. आम्ही सर्वच महापुरुषांचा आदर करतो. विरोधाचा विषय नसून कार्यपद्धतीचा आहे. तसेच अनेक विषय आहेत. ज्या प्रकारे हे विषय घडले आहेत, त्याबद्दल हायकमांड नाराज आहे. त्याची दखल हायकमांडने घेतली असून त्यावर येणाऱ्या काळात काय निर्णय घेतले जातील ते आगामी काळात दिसेल, असेही नसीम खान म्हणाले. काँग्रेसमध्ये पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. पक्षाची विचारधारा, महापुरुषांबद्दल असलेली बांधिलकी यांच्यावर कोणताही नेता मोठा नाहीये. काही चुकीचे घडत असेल तर हायकमांड निश्चितपणे निर्णय घेईल, असेही नसीम खान म्हणाले.