Sanjay Raut : चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मित्रपक्ष काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. ज्या शहरात काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक आहेत, तिथे त्यांना आपला महापौर बसवता येत नसेल, तर त्यांनी आत्मचिंतन करावे. या गोंधळाला काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच जबाबदार असून, त्यांनीच याची लाज बाळगायला हवी, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. चंद्रपूरच्या महापौर निवडणुकीत ठाकरेसेनेच्या नगरसेवकांनी अनपेक्षितपणे भाजपला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या युतीमुळे भाजपच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी वर्णी लागली, तर ठाकरेसेनेचे प्रशांत दानव उपमहापौर म्हणून निवडून आले. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (मविआ) एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना संजय राऊत यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.संजय राऊत म्हणाले, चंद्रपूरमध्ये भाजपला मदत करू नका, असे स्पष्ट आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले होते. गरज पडल्यास विरोधी बाकावर बसण्याची तयारी ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांच्या आपापसांतील वाद आणि समन्वयाच्या अभावामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपमध्ये वरच्या पातळीवर कोणतीही युती झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.