S.Jaishankar : चीनबरोबरचे संबंध पुर्वीपेक्षा अधिक चांगले; परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : भारताचे चीनसोबतचे संबंध लक्षणीयरीत्या सुधारले आहेत, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी सांगितले. भारत आणि चीन आता कोविड-१९, थेट उड्डाणे आणि कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याशी संबंधित परस्पर मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. दोन्ही देशांमधील संबंध पूर्वीपेक्षा खूपच चांगले आहेत. विशेषतः डेप्सांग डेमचोक सारख्या महत्वाच्या ठिकाणांवरील सैन्य माघारीचे पाऊल हे विशेष महत्वाचे होते, असेही ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आता आम्ही काही प्रमाणात सीमेवरील समस्यांवर लक्ष केंद्रित करत आहोत. कारण गेल्या काही वर्षांपासून तेथे सैन्याची उभारणी सुरू आहे. या काळात इतरही अनेक गोष्टी घडल्या. त्यापैकी काही परिस्थितीशी संबंधित होत्या आणि काही कोविड काळातील बदल होते. आम्ही नेहमीच असे म्हटले आहे की २०२०-२०२४ मधील परिस्थिती कोणत्याही देशाच्या हिताची नव्हती; ती आमच्या संबंधांच्या हिताची नव्हती. आता ते मान्य झाले आहे आणि आम्ही सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत, असे ते म्हणाले.
यापूर्वी, ऑक्टोबर २०२४ मध्ये, भारत आणि चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दोन महत्वाची ठिकाणे असलेल्या देपसांग मैदानी प्रदेश आणि डेमचोक येथे गस्त घालण्याच्या व्यवस्थेबाबत करार केला होता. पूर्व लडाखमधील इतर महत्वाच्या ठिकाणांवरील सैन्य माघारीनंतर, राजनैतिक आणि लष्करी पातळीवर झालेल्या बैठकींनंतर हा करार झाला.





