“अस्स… हा…’
आईच्या तोंडचे हे उद्गार ऐकताच “काय झाले आई’ असे म्हणत प्रणवने तिचा हात हातात घेतला.
“फार काही नाही झालं, भाजीच्या पातेल्यावरची ताटली काढली, तर चटका बसला.’
“ताटलीतले पाणी हातावर आले का? ताटली आणि पाणी दोन्ही गरम झाले असेल ना?’ आईच्या हातावर प्रेमाने फुंकर घालत प्रणव बोलला.
“अगं आई, भाजीत पाणी घालायचे सोडून वरच्या ताटलीत का ठेवले आहेस?’ प्रणवने शंका विचारली.
“प्रणव, याची दोन कारणे आहेत. त्यातल्या एका कारणाचे उत्तर तू शोधायचे आहेस. ते सांगितलेस तर मी त्यामागचे दुसरे कारण कोणते सांगेन.’
“ओके तुझे चॅलेंज मान्य’, असं म्हणत प्रणव मित्रांना फोन करायला धावला व मित्रचौकडीला आज प्रयोग करायचा आहे घरी या म्हणून सांगितले. दुपारी जमल्यावर सगळ्यांनी मिळून चर्चा केली अन् काय करायचे ते ठरवले.
“तर… आज आम्ही एक वैज्ञानिक प्रयोग सादर करत आहोत. या प्रयोगाद्वारे प्रणवच्या घरात पाऊस पडणार आहे आणि हो, यातच काकूंनी ताटलीवर पाणी का ठेवले याचे उत्तर आहे.’ अत्यंत नाटकी पद्धतीने प्रणवच्या आई-बाबांसमोर तन्वीने सांगायला सुरुवात केली. तन्वी बोलत होती तोपर्यंत मिहीरने चहाच्या किटलीत पाणी उकळायला ठेवले होते तर प्रणव फ्रिजमधील खूप सारा बर्फ ताटलीत काढून तयार होता.
पाण्याला उकळी आली. किटलीतून वाफ बाहेर यायला सुरुवात झाली. त्या बाहेर पडणाऱ्या वाफेवर प्रणवने बर्फ ठेवलेली ताटली धरली आणि खरंच की बाहेर येणाऱ्या वाफेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली होती.
“काकू, भूपृष्ठावरील पाण्याचेही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफेत रूपांतर होत असते. ती वाफ वर वर जाते. तिला थंडावा मिळतो व त्या वाफेचे परत पाण्यात रूपांतर होते आणि ते पाणी परत खाली म्हणजे भूपृष्ठाकडे येते.त्यालाच आपण पाऊस म्हणतो.’
“आणि आई, कोणत्याही भाजीत जलांश असतोच. त्यामुळे भाजी शिजवताना जेव्हा उष्णता मिळते, तेव्हा भाजीत असणाऱ्या या पाण्याचे वाफेत रूपांतर होते.
तू ताटलीत पाणी ठेवले होतेस. या पाण्याचे तापमान पातेल्यात तयार झालेल्या वाफेपेक्षा कमी होते. त्यामुळे पातेल्यातील वाफेचे परत पाण्यात रूपांतर झाले व भाजीत पाणी न घालताही वाफेच्या पाण्यावर भाजी शिजली.’ प्रणवने मिहीरच्या बोलण्याचा संदर्भ घेत आईच्या चॅलेंजचे उत्तर दिले.
“अरे व्वा प्रणव! तू आणि तुझ्या मित्रांनी मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सप्रयोग दिलेत.’
“काकू, आता ताटलीत पाणी ठेवण्याचे दुसरे कारण कोणते ते सांगणार ना?’ सावनीने विचारले.
“हो सांगते. मला सांगा किटलीतील उकळत्या पाण्याचे तापमान किती असते?’
“100 अंश सेल्शियस आणि नंतर पाण्याची वाफ होते. तापमान मात्र तेवढेच राहते,’ आईने विचारताच प्रणव बोलला.
“जेव्हा झाकण ठेवून त्याच्यावर दाब निर्माण केला जातो, तेव्हा निर्माण झालेली वाफ भांड्यातच जमा होते व त्या वाफेचाही दाब पाण्यावर येतो आणि मग पाण्याचे तापमान वाढते. या वाढलेल्या उष्णतेमुळे कमी इंधनात भाजी लवकर शिजते.’
“आता या तत्त्वावर आधारित स्वयंपाकघरात वापरले जाणारे भांडे कोणते सांगा बरं,’ बाबांनी प्रश्न विचारला.
“प्रेशर कुकर? बरोबर ना?’ मिहीरने विचारले.
“एकदम बरोबर आणि मला खात्री आहे या प्रेशर कुकरचा इतिहास तुम्ही आता माहीत करून घ्यालच. हो ना बालमित्रांनो?’
– विशाखा गंधे