Rohit Sharma : भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिलादेखील या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. गणतंत्र दिन २०२६ च्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी २०२६ रोजी पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली, ज्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हरमनप्रीत कौर यांचा समावेश होता. पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे. पुरस्काराची पार्श्वभूमी आणि योगदान रोहित शर्मा यांना हा पुरस्कार क्रिकेटमध्ये दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी मिळाला आहे. त्यांच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाने २०२४ मध्ये टी20 विश्वचषक जिंकला आणि २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. रोहित शर्माने आशियात केला मोठा विक्रम रोहित याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० हून अधिक धावा केल्या असून, तो एकमेव खेळाडू आहे ज्याने तीन वेळा वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावले आहे. टी20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो २०२७ च्या वनडे विश्वचषकासाठी प्रयत्नशील आहे. हरमनप्रीत कौरने देखील भारतीय महिला संघाला ऐतिहासिक यश मिळवून दिले असून, तिच्या नेतृत्वाखाली महिला संघाने अलीकडेच ODI विश्वचषक जिंकला होता. दोन्हीही खेळाडूंच्या या यशाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच रोहित शर्माने भारत सरकारचे आभार व्यक्त केले. दूरदर्शन स्पोर्ट्सने (DD Sports) त्याचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात रोहित भावनिक होऊन बोलताना दिसत आहेत. रोहित म्हणाला, “पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल मी भारत सरकारचे मनापासून आभार मानतो. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत खास आणि भावनिक क्षण आहे. माझ्या करियरमध्ये ज्या ज्या लोकांनी मला मदत केली, मार्गदर्शन केले, त्यांचेही मी आभार मानतो. माझे प्रयत्न असेच चालू राहतील. देशासाठी मॅच खेळणे आणि देशासाठी ट्रॉफी जिंकणे यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन.” रोहित आणि हरमनप्रीत यांच्या या सन्मानाने क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हे पण वाचा : Kapil Dev : बहिष्कारावरून कपिल देव यांनी पाकिस्तानला दिला ‘हा’ मोठा इशारा