Hardik Pandya – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआय (BCCI) आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी दोन वेगळे कर्णधार निवडण्याबाबत विचार करत आहे. पुढील वर्षी जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेद्वारे या प्रकारचे बदल दिसण्याची दाट शक्यता आहे. जानेवारीमध्ये भारतीय संघाला मायदेशात श्रीलंकेविरुद्ध ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआय वेगवेगळ्या कर्णधारांना नेमण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा कर्णधार राहिला तर टी-२० संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे ( Hardik Pandya ) सोपवले जाऊ शकते.
#ENGvsPAK | “पाकिस्तान हार गया…”सामना हरल्याने चाहत्याला भावना अनावर
इनसाइड स्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “टी-२० संघाच्या नेतृत्वाबाबत पुष्टी करणे खूप घाईचे ठरेल, परंतु आम्ही एकदिवसीय आणि टी-२० संघांसाठी स्वतंत्र कर्णधारांची नियुक्ती करणे योग्य ठरेल का, याबाबत विचार करत आहोत. त्यामुळे एकाच व्यक्तीवर येणार भार कमी केला जाऊ शकतो. २०२३ मध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला जाईल तेव्हा त्यासाठी सातत्य आवश्यक आहे. आम्हाला टी-२० क्रिकेटकडे नव्या दृष्टिकोनातुन पाहण्याची गरज आहे. वेगवेगळ्या प्रकारातील नेतृत्वाबाबत जानेवारीपासून प्रयोग केले जातील. त्यासाठी आमची बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय होणार आहे.”
यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही भारतीय संघ सेमीफायनलमध्ये अपयशी ठरला. त्यामुळे रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रोहितचे आता वय ३५ वर्ष असून पुढच्या टी-२० विश्वचषकात म्हणजेच २०२४ मध्ये तो ३७ वर्षांचा होईल. दुसरीकडे, हार्दिक पांड्याकडे ( Hardik Pandya ) आता सातत्याने टी-२० संघाची जबाबदारी दिली जात आहे.
टी-२० विश्वचषकानंतर पांड्याला आता न्यूझीलंड दौऱ्यावरील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. इनसाइड स्पोर्ट्सच्या मते, हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya ) जानेवारीच्या सुरुवातीला भारतीय टी-२० संघाचा नियमित कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. तर रोहित शर्मा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात येईल.