Road Accident Risk: चालकांनो सावधान! पुणे-नाशिक महामार्गावरील ‘हे’ वळण ठरतंय मृत्यूचा सापळा; कधीही होऊ शकतो मोठा अपघात
Road Accident Risk: ग्रामस्थांचा महामार्ग प्रशासनाविरोधात आक्रोश; आमदार बाबाजी काळे आणि समन्वयक दिलीप मेदगे यांच्याकडून पाहणीचे आणि उपायांचे आश्वासन.

Road Accident Risk – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पानमळा आणि तुकाईवाडीकडे जाणार्या वळणावर दबलेले गतिरोधक, फुगलेले डांबर आणि भरधाव वाहने यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तुकाईवाडी चौकातील जुने वळण बॅरिकेड लावून बंद करण्यात आल्याने पानमळा येथील वळणावर वाहनांची गर्दी वाढत असून, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
सांडभोरवाडी, तुकाईवाडी, भांबुरवाडी परिसरातील नागरिकांना राजगुरुनगर, मंचरकडे जाण्यासाठी या राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे पानमळा वळणावर महामार्गावर ये-जा करताना तसेच लेन बदलताना वाहनचालकांची मोठी कसरत होत आहे. त्यातच रस्त्यावरील गतिरोधक दबले असून, काही ठिकाणी डांबर फुगल्याने वाहने आदळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सेवा रस्त्याचे नियोजन करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरूनच धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत आहे. पानमळा वळणावरील गतिरोधकांची तातडीने दुरुस्ती करावी, फुगलेले डांबर हटवावे आणि वाहनचालकांना सुरक्षितपणे वळण घेता येईल,
अशी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या समस्येबाबत ह.भ.प. पोपट महाराज राक्षे, राजेंद्र पाचारणे, विजय थिगळे यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महामार्ग प्रशासनाकडे माहिती देण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली.
वरिष्ठ अधिकार्यांकडून पाहणीचे आश्वासन
पानमळा वळणावरील परिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची माहिती महामार्ग प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आली आहे. अधिकार्यांनी येत्या आठवड्यात प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती पुणे-नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी दिली.






