पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत (शुक्रवार, १७ ऑक्टोबर) संपत असतानाच, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रणित ‘महागठबंधन’मध्ये (आता INDIA आघाडीचा भाग) जागावाटपावरून प्रचंड गोंधळ उडाला आहे. जागावाटपाचा अधिकृत फॉर्म्युला निश्चित होण्यापूर्वीच, अनेक महत्त्वाच्या जागांवर काँग्रेस आणि आरजेडी, तसेच मित्रपक्ष आणि व्हीआयपी (VIP) पक्षाच्या उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध अर्ज दाखल केले आहेत. या अभूतपूर्व संघर्षामुळे महागठबंधनच्या कार्यकर्त्यांसमोर मोठी धर्मसंकटाची स्थिती निर्माण झाली आहे की, त्यांनी नेमका कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर आहे, त्यामुळे तोपर्यंत हा अंतर्गत संघर्ष मिटणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणत्या जागांवर संघर्ष? वैशाली: आरजेडीकडून अजय कुशवाहा आणि काँग्रेसकडून संजीव कुमार. लालगंज (वैशाली): आरजेडीकडून बाहुबली नेते मुन्ना शुक्ला यांच्या कन्या शिवानी शुक्ला आणि काँग्रेसकडून आदित्य कुमार राजा. बछवाडा: सीपीआयचे अवधेश राय यांच्याविरुद्ध काँग्रेसचे गरीब दास. गौरा बौराम: आरजेडीचे अफजल अली यांच्यासमोर व्हीआयपीचे संतोष सहनी. (या जागेसाठी आरजेडीने व्हीआयपीला ही जागा दिल्याचे स्पष्टीकरण नंतर दिले.) कहलगाव: आरजेडीचे रजनीश यादव यांच्यासमोर काँग्रेसचे प्रवीण कुशवाहा. राजापाकड: सीपीआयचे मोहित पासवान यांच्यासमोर काँग्रेसच्या प्रतिमा दास. रोसडा: सीपीआयचे लक्ष्मण पासवान यांच्यासमोर काँग्रेसचे बीके रवी. जागा वाटपाचा घोळ कायम – महागठबंधनमध्ये अद्याप कोणत्या पक्षाला किती जागा, हे जाहीर झालेले नाही. केवळ काँग्रेसनेच ४८ जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. दरम्यान, राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांमध्येही चर्चा झाल्याची माहिती आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी बोलणी केली होती. जागा वाटपावर एकमत न झाल्यावर खर्गे आणि राहुल गांधी यांनी थेट आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. मुकेश सहनींचा निवडणुकीतून माघार – या सर्व गोंधळात ‘विकासशील इंसान पार्टी’ (VIP) चे प्रमुख मुकेश सहनी यांनी मोठा निर्णय घेत आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. ते गौरा बौराम येथून अर्ज भरणार होते, पण आता त्यांनी आपले भाऊ संतोष सहनी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर आरजेडीचे अफजल अली यांनीही अर्ज भरल्यामुळे संघर्ष कायम आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांनी अर्ज भरले असले तरी, ‘फ्रेंडली फाईट’ (Friendly Fight) च्या नावाखाली अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख (२० ऑक्टोबर) पर्यंत पक्षांमध्ये अंतिम समझोता होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, तोपर्यंत महागठबंधनमधील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम राहणार आहे. बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान आणि 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.