Ring Road Blasting: रिंगरोड ब्लास्टिंगने गाव हादरलं! घरांना तडे, दगड उडाल्याने ग्रामस्थ आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
Ring Road Blasting: कासारआंबोलीत रिंगरोडच्या तीव्र स्फोटांमुळे घरांचे नुकसान; प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी, कंपनीला दिला कठोर कारवाईचा इशारा.

Ring Road Blasting – कासारआंबोली ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या कामासाठी होत असलेल्या तीव्र ब्लास्टिंगमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेला धोका निर्माण झाल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. सततच्या स्फोटांमुळे घरांना तडे जाणे, दगड उडणे, मोठ्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे तसेच जनावरांनाही त्रास सहन करावा लागत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) सुरेंद्र नवले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित कंपनीला कडक सूचना दिल्या. कासारआंबोली परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करण्यात येत आहे. या स्फोटांमुळे निर्माण होणार्या कंपनांमुळे अनेक घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. याशिवाय शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शेतकरी यांना दैनंदिन जीवनात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात ग्रामपंचायतीने यापूर्वीच एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या तीव्र नाराजीची माहिती मिळताच प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी तात्काळ दखल घेतली. विशेष म्हणजे स्वतःचा वाढदिवस असतानाही त्यांनी वैयक्तिक कार्यक्रम बाजूला ठेवून कासारआंबोली येथे भेट दिली.

कासारआंबोली : परिसरातील रिंगरोड प्रकल्पाच्या ब्लास्टिंगस्थळी ग्रामस्थांसमवेत पाहणी करताना प्रांताधिकारी सुरेंद्र नवले.
त्यांनी ग्रामस्थांसोबत सुमारे एक किलोमीटर पायी चालत जाऊन ब्लास्टिंगच्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कंपनीच्या अधिकार्यांना आणि कर्मचार्यांना नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. स्फोटांचा आवाज व कंपन कमी करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नवले यांनी दिला.
प्रांताधिकार्यांच्या या तत्पर भूमिकेमुळे ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी केवळ भेटी व सूचनांवर प्रश्न सुटणार नाही, अशी भावना स्थानिकांमध्ये आहे. ब्लास्टिंगसाठी स्पष्ट सुरक्षा नियमावली, ध्वनी व कंपन मोजणी यंत्रणा, नुकसानग्रस्त घरांचे सर्वेक्षण आणि भरपाईची प्रभावी व्यवस्था राबविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“प्रांताधिकार्यांनी तातडीने दखल घेऊन पाहणी केली, याचे स्वागत आहे. मात्र समस्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. घरांना तडे जाणे, दगड उडणे आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे केवळ तोंडी सूचना न देता स्पष्ट सुरक्षा नियम, नुकसानभरपाईची यंत्रणा आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.”
– ज्ञानेश्वर आखाडे, सामाजिक कार्यकर्ते





