जालौन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या राजकारणावर जोरदार टीका केली. या राजकारणाचा त्यांनी रेवडी कल्चर अर्थात रेवडी संस्कृती असा उल्लेख करून ही संस्कृती देशाच्या विकासासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. तब्बल 14 हजार 850 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते.
विरोधी पक्षांना लक्ष्य करून ते म्हणाले की, रेवडी कल्चरवाले नवे द्रूतगती महामार्ग तयार करणार नाहीत. नवी विमानतळे तयार करणार नाहीत. नवे डिफेन्स कॉरिडॉर तयार करणार नाहीत. लोकांना मोफत वाटप करून त्यांना विकत घेऊ, असे यांना वाटते. त्यांचा हा विचार आणि दृष्टिकोनच आपल्याला एकत्रितपणे पराभूत करायचा आहे. देशातून रेवडीच्या राजकारणाचे उच्चाटन करायचे आहे.
उत्तर प्रदेशातील डबल इंजिन सरकार आता वेगात काम करत असून राज्यात बदल घडवून आणत आहे. बुंदेलखंड द्रूतगती मार्गामुळे चित्रकुट ते दिल्ली अंतर तीन ते चार तासांनी कमी झाले आहे. मात्र, त्याचे अनेक मोठे फायदे आहेत. हा मार्ग केवळ वाहनांनाच नाही, तर बुंदेलखंडच्या ओैद्योगिक प्रगतीलाही गती देणार आहे.
संपूर्ण देशात आज उत्तर प्रदेशची वेगळी ओळख : पंतप्रधान
राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या कार्याची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले की, राज्यातील कायदे व्यवस्थेत आणि एकूणच व्यवस्थेची वेगाने प्रगती होते आहे. आम्ही केवळ वर्तमान काळातील सुविधा तयार करत नसून देशाचे भविष्यही घडवत आहोत. रायबरेलीच्या रेल्वे कोच फॅक्टरीत केवळ रेल्वेच्या डब्यांचे रंगरंगोटीचे काम केले जात होते, त्या उत्तर प्रदेशात आम्ही पायाभूत सुविधांवर करत असलेल्या कामामुळे या राज्याने इतर अनेक राज्यांना मागे टाकले आहे. संपूर्ण देशात आज उत्तर प्रदेशची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
आम्ही द्रौपदी मुर्मूचा आदर करतो पण आमचा यशवंत सिन्हांना पाठिंबा – आम आदमी पार्टी