काँग्रेसला मोठा धक्का ! ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

हिंगोली : विधानपरिषद निवडणुक अवघ्या काही दिवसांवर आली असता आता काँग्रेसमधील नाराजी नाट्य समोर आले आहे. काँग्रेसकडून विधानपरिषेदेसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजूर केला आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. या उमेदवारीवरुन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हाफिज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आज सुपूर्द केला.
काय लिहिले राजीनाम्यात?
लोकसभा निवडणुकीमध्ये 90% मते मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या बाजूने दिली आणि मराठवाड्यातील आठपैकी 7 जागा महाविकास आघाडीला निवडून दिल्या. तरी, अल्पसंख्यांक नेत्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले नाही. याशिवाय प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचार केल्याची तक्रार हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली होती. तरी देखील त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची मान खालावली आहे. पक्षाने मुस्लिम समाजाच्या अपेक्षा आणि त्यांच्या प्रतिनिधित्वाची उपेक्षा केली आहे. त्यामुळे, आपण पदाचा राजीनामा देत असे अब्दुल हाफिज यांनी आपल्या राजीनाम्यात म्हंटले आहे.
नागेश आष्टीकर यांचाही उमेदवारीला विरोध
हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे, त्यांना उमेदवारी न देता त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागेश पाटील आष्टीकर यांनी केली होती.





