Raj Thackeray : राजीनामा द्या आणि भाजपमध्ये सामील व्हा! राज ठाकरे विश्वास नांगरे पाटलांवर भडकले
Raj Thackeray : तर त्यांनी सरकारी सेवेतून राजीनामा देऊन भाजप किंवा संघात अधिकृतपणे प्रवेश करावा, अशी घणाघाती टीकाही राज ठाकरे यांनी केली.

Raj Thackeray : आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या अलीकडील एका वक्तव्यावरून नव्या वादाला तोडं फुटलं आहे. सकल हिंदू समाजाच्या संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी गौरवोद्गार काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका केली जात आहे.
आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील विश्वास नांगरे पाटील यांच्या वक्तव्याविषयी संताप व्यक्त केला आहे. सरकारी सेवेत असलेल्या आणि अत्यंत जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने सार्वजनिक कार्यक्रमात एका विशिष्ट संघटनेप्रती जाहीर निष्ठा व्यक्त करणे योग्य आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
नांगरे पाटील यांनी व्यक्त केलेली भूमिका त्यांच्या निष्पक्षतेबाबत शंका निर्माण करणारी असल्याचे सांगत, जर त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल इतकीच आस्था असेल, तर त्यांनी सरकारी सेवेतून राजीनामा देऊन भाजप किंवा संघात अधिकृतपणे प्रवेश करावा, अशी घणाघाती टीकाही राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी केली.
राज ठाकरे यांची पोस्ट आहे तशी (Raj Thackeray)
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा… ( Raj Thackeray)
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
हेही वाचा : Hormuz strait : होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाद पुन्हा सुरू; इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे प्रत्युत्तर
संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा (Raj Thackeray)
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर… (Raj Thackeray)
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? (Raj Thackeray)
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
….तर लोकांनी बघायचं कोणाकडे ? (Raj Thackeray)
आमदार, खासदार यांना ‘आमच्याकडे या’ म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ? नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !





