मुंबई – राज्यभरातील सुमारे सात हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. रखडललेल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार आहे. अतिदक्षता विभाग वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मागील एका वर्षांपासून कित्येक बैठका होऊनही अजुन कोणतीच मागणी मान्य न झाल्याने डॉक्टरांनी आंदोलन सुरु केले आहे.
सेन्ट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना पत्र देण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी मागील एका वर्षापासून मंत्र्यांसोबतच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका होऊनही प्रतिसाद न दिल्याने निवासी डॉक्टरांनी आजपासून संपाचा हत्यार उगारले आहे. मुंबईतील केईएम, नायर, सायन, कूपर रुग्णालयात काम करणारे निवासी डॉक्टर्स संपावर होते. तसेच यवतमाळ, अंबाजोगाईसह राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे रुग्ण सेवेवर या संपाचा परिणाम होताना पाहायला मिळाला.
वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर सध्या संपावर आहेत. मात्र सगळ्याच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्या इमर्जन्सी सर्व्हिस चालू आहेत. मात्र दोन दिवसांमध्ये सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही चालू असलेले इमर्जन्सी सर्व्हिससुद्धा बंद करू असा पवित्रा निवासी डॉक्टरांनी घेतला आहे.
मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक – गिरीष महाजन
निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घ्यावा. निवासी डॉक्टरांच्या महागाई भत्ताबाबतचं प्रकरण वित्त विभागाकडे प्रलंबित आहे. त्याबाबत आमचा वित्त विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे. 15 दिवसांत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात निर्णय घेऊ, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. महाजन म्हणाले, डॉक्टरांनी संपाची आग्रही भूमिका घेणे चुकीच आहे. निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मी स्वत: सकारात्मक आहे. त्यांच्या प्रश्नांची पूर्ण जाणीव आहे. निवासी डॉक्टर कसे राहतात, त्यांच्या सगळ्या अडचणींची कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.