रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट ! नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना; नारायण राणे यांच्याकडून अतिवृष्टी भागाची पाहणी

Rain Update । Narayan Rane : रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असल्याने अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत. रत्नागिरीत तर 205 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उद्या देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
रायगडच्या समुद्राला उधाण आले आहे. दुपारनंतर समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होताच. काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर समुद्र आणखी खवळेल असा अंदाजही हवानाम खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान, मच्छीमारांना अजिबात समुद्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिवृष्टी !
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिवृष्टी सुरू असून ओरोस, जिजामाता नगर येथील शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. जिजामाता नगर येथे अतिवृष्टी झालेल्या भागाची माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे व भाजप नेते निलेश राणे यांनी पाहणी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिवृष्टी सुरू असून ओरोस, जिजामाता नगर येथील शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
आज जिजामाता नगर येथे अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. pic.twitter.com/q9S97KYW8U— Narayan Rane (@MeNarayanRane) July 8, 2024
सर्व नागरिकांची डॉन बॉस्को हायस्कूल व राजधानी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत प्रशासन आहे, हा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना तातडीने करायच्या सूचना नारायण राणे यांनी दिल्या आहेत.
राजापूर तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या मिळंद आणि जवळेथर या रस्त्याच्या दरम्यान दरड रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे इथल्या वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे.





