महाराष्ट्र भाजपला मोठा धक्का; ‘या’ मित्रपक्षाने साथ सोडली

पंढरपूर – राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपची साथ सोडली असून आगामी निवडणुकामंध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. 2014 च्या निवडणुकीआधी राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपसोबत युती केली होती. त्यावेळी जानकर बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरले होते. तेंव्हा त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला चांगलाच घाम फोडला होता. मात्र आता जानकर यांनी भाजपची साथ सोडली असून स्वबळाचा नारा दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरात रासपच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला महादेव जानकर उपस्थित होते. जानकर म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रासप स्वबळावर लढवणार आहे. आमच्या पक्षाची ताकद वाढली तर महत्व वाढेल. तसेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रासपला विचारात घेतल्याशिवाय सरकार बनणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील माढा, बारामती, परभणी आणि उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर यांच्यापैकी एका लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी जानकर यांनी सुरू केली आहे.
दरम्यान, 2014ला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात राज्यात शिवसेना-भाजप महायुती झाली होती. या महायुतीमध्ये रामदास आठवलेंची आरपीआय, राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महादेव जानकरांच्या रासप या पक्षांचा समावेश होता. 2014 निवडणुकीनंतर महादेव जानकरांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदही मिळाले होते. मात्र आता जानकरांनी स्वबळाचा नारा दिल्याने भाजप नेतृत्वाशी त्यांचे खटकले असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.





