Ramdas Athawale: उदयनराजेंच्या भेटीनंतर रामदास आठवलेंची खास शैलीत कविता; महायुतीबाबत केलं मोठं वक्तव्य
Ramdas Athawale: साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली खासदार उदयनराजे भोसलेंची सदिच्छा भेट; आगामी सत्तावाटप आणि रिपाइंच्या सहभागावर झाली चर्चा.

Ramdas Athawale – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सातारा दौर्यात खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यातील राजकीय घडामोडी, महायुतीतील समन्वय आणि सत्तेमध्ये रिपाइंच्या सहभागाबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेत रिपाइंला सन्मानजनक वाटा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आठवले यांनी उदयनराजे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. उदयनराजे हे माझे जुने आणि जिव्हाळ्याचे मित्र आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा ते जपत आहेत. त्यांच्या भेटीने नेहमी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते, असे ते म्हणाले. ‘उदयनराजे माझे चांगले मित्र, माझ्या मनात असते छत्रपती शिवरायांचे चित्र’ अशी आपल्या खास शैलीतील कविता त्यांनी सादर केली.
राज्यातील सत्ता वाटपाबाबत बोलताना आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला. महायुतीमध्ये रिपाइं हा महत्त्वाचा घटक पक्ष आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राज्य मंत्रिमंडळात किंवा विविध महामंडळांवरील नियुक्त्यांमध्ये रिपाईला योग्य प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा आहे. रिपाइंला सन्मानजनक स्थान देण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
देशाच्या राजकारणावर भाष्य करताना आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. गेल्या बारा वर्षांत भारताने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रादेशिक स्तरावर नव्याने स्थापन होणार्या पक्षांचा प्रभाव मर्यादित राहील, असे मतही त्यांनी व्यक्त केले. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. मात्र देशाच्या विकासासाठी मजबूत नेतृत्व आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील अनुसूचित जातींना न्याय मिळावा, अशी भूमिका मांडली. महाराष्ट्रात अनुसूचित जातींमध्ये अनेक उपजाती आहेत. उपवर्गीकरणामध्ये कोणत्याही समाजघटकावर अन्याय होता कामा नये, ही आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.






