Rakesh Tikait : धार्मिक व्यक्तींनी वादग्रस्त विधाने करू नयेत; रामभद्राचार्यांच्या वक्तव्यावर टिकैत यांची टीका

लखनौ : जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी भारतातील काही भागांना मिनी पाकिस्तान म्हटले आहे. यावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आता तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जर असेच विधान एखाद्या मुस्लिम धार्मिक नेत्याने केले असते तर आतापर्यंत त्यांच्यावर कडक कारवाई झाली असती असे नमूद करत महाराजांसारख्या आदरणीय धार्मिक व्यक्तीने अशी वादग्रस्त विधाने करू नयेत असे त्यांनी म्हटले आहे.
टिकैत यांनी आरोप केला की अशी विधाने सरकारच्या अजेंडाचा भाग आहेत आणि धार्मिक नेते देखील सरकारला जे हवे आहे तेच बोलत आहेत. सरकारला अशी विधाने करायची आहेत जेणेकरून समाजात वादविवाद आणि फूट पडेल. दुर्दैवाने, आता आपले धार्मिक नेते देखील या कटाचा भाग बनत आहेत, त्यांनी त्यापासून दूर राहावे.
राकेश टिकैत यांनी असाही दावा केला की, या धार्मिक आणि सामाजिक विधानांमुळे भारताची जागतिक प्रतिमा मलिन होत आहे. भारत आता जगात जात, धर्म, भाषा आणि लिंगाच्या आधारावर विभागलेला देश म्हणून पाहिला जात आहे. सरकारलाच त्यावर वादग्रस्त विधाने आणि वादविवाद हवे आहेत. अनेक धार्मिक नेते सरकारच्या अजेंडाचे अनुसरण करत आहेत, असे पाकिस्तानमध्येच होते.





