Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीवरून झामुमो-काँग्रेसमधील पेच सुटला ; प्रत्येकी एक जागा लढवण्यावर शिक्कामोर्तब
Rajya Sabha Election : झारखंडमधील सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या झामुमो आणि काँग्रेस यांच्यात राज्यसभा निवडणुकीसंदर्भातील जागावाटपाचा पेच अखेर सुटला आहे.

Rajya Sabha Election : झारखंडमधील सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या झामुमो आणि काँग्रेस यांच्यात राज्यसभा निवडणुकीसंदर्भातील जागावाटपाचा पेच अखेर सुटला आहे. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी एक जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
झारखंडमधून राज्यसभेच्या दोन जागांसाठी १८ जून रोजी निवडणूक होणार आहे. या जागांवर उमेदवारीबाबत दोन्ही पक्षांमध्ये सुरुवातीला एकमत होऊ शकले नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते.
दरम्यान, काँग्रेसने कोणतीही अंतिम सहमती होण्यापूर्वीच प्रणव झा यांची उमेदवारी जाहीर केली होती. दुसरीकडे, झामुमोच्या काही नेत्यांकडून दोन्ही जागांवर पक्षानेच निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, पक्षाने सावध भूमिका घेत माजी मंत्री बैद्यनाथ राम यांना उमेदवारी दिली आणि दुसऱ्या जागेबाबत काँग्रेसशी चर्चा करून निर्णय घेण्याचे संकेत दिले होते.
अखेर मुख्यमंत्री हेमंत सोरेन, काँग्रेस नेता भुपेश बघेल आणि अजय शर्मा यांच्यात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला. या बैठकीत दोन्ही पक्षांनी प्रत्येकी एक जागा लढवण्याच्या निर्णयाला अंतिम मंजुरी दिली.
झारखंड विधानसभेतील एकूण ८१ सदस्यांपैकी झामुमोच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीकडे ५६ आमदारांचे भक्कम संख्याबळ आहे. त्यामुळे राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आघाडीच्या उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.





