TMC merged into Congress: परत फिरा घराकडे…! राजकारणात नवा अध्याय? ; ममतांना काँग्रेसची थेट ऑफर, विलीकरणाच्या चर्चांना वेग
TMC merged into Congress: भारतीय राजकारणात आगामी काळात मोठी उलथापालथ होणाऱ्या घडामोडींना वेग आला आहे.

TMC merged into Congress: भारतीय राजकारणात आगामी काळात मोठी उलथापालथ होणाऱ्या घडामोडींना वेग आला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दबावाखाली आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना काँग्रेसकडून मोठा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेतृत्वाने ममता बॅनर्जींसमोर ठेवला असल्याचे सांगितले जात आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब याठिकाणी ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी ममता बॅनर्जी दिल्लीत दाखल झाल्या असून, निवडणुकीतील पराभवानंतर त्या प्रथमच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तृणमूल काँग्रेसवर वाढता दबाव
पश्चिम बंगालमधील सत्तेचा गड गमावल्यानंतर तृणमूल काँग्रेस अनेक अडचणींचा सामना करत आहे. पक्षातील नाराजी वाढत असल्याची चर्चा असून, काही खासदार, आमदार आणि स्थानिक नेते पर्यायी राजकीय पर्यायांचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे.
अशा परिस्थितीत राष्ट्रीय पातळीवरील मजबूत राजकीय आधार मिळवण्यासाठी काँग्रेससोबत अधिक जवळीक साधण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
‘इंडिया’ आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक (TMC merged into Congress)
सुमारे दोन वर्षांनंतर होत असलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्या माहितीनुसार, या बैठकीत २३ विरोधी पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहू शकतात.
दरम्यान, बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.
आघाडीत मतभेद कायम
‘इंडिया’ आघाडीची बैठक होत असताना काही पक्षांनी मात्र अंतर राखल्याचे दिसून येत आहे. आम आदमी पार्टी आणि द्रमुक या बैठकीपासून दूर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच झारखंडमधील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या निर्णयामुळे झारखंड मुक्ती मोर्चामध्ये नाराजी असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसची ‘घरवापसी’ मोहीम (TMC merged into Congress)
दरम्यान, काँग्रेसने पक्ष सोडून गेलेल्या जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याशी संबंधित राजकीय घडामोडींवरही लक्ष ठेवले जात आहे.
अमरिंदर सिंग भाजपमध्ये सक्रिय असले तरी त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे, जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत काँग्रेसच्या काही नेत्यांकडून संवाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. जरी या घडामोडींना अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी आगामी काळात विरोधी राजकारणात मोठे बदल घडू शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.






