Rajkummar Rao: बॉलिवूडमध्ये कुटुंबाची पार्श्वभूमी नसताना स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या संवेदनशील अभिनेत्यांपैकी राजकुमार राव हे एक महत्त्वाचे नाव आहे. नुकतच ‘स्त्री २’ या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं. हॉरर कॉमेडी या प्रकारातल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अफाट कमाई केली होती. त्यानंतर राजकुमारच्या जवळजवळ सगळ्याच चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला, त्याचं कौतुकही झालं. मात्र, या यशामागे त्याचा संघर्ष, मेहनत आणि चिकाटी दडलेली आहे. सुरुवातीचा प्रवास कठीण होता करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण काढताना राजकुमार म्हणतो, “माझ्यासाठी इंडस्ट्रीतील सुरुवातीची वर्ष अजिबात सोपी नव्हती. पण मी अभिनयासाठी आणि नकारासाठी तयार होऊन आलो होतो. गुरगावमध्ये तब्बल तीन वर्ष मी रंगभूमीवर काम केलं. त्यानंतर दीड-दोन वर्ष फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये तयारी केली. त्यामुळे मी फक्त मित्रांनी सांगितलं म्हणून इथे आलो नव्हतो, तर मी ‘हिरो’ व्हायला आलो होतो. माझं लहानपणापासून एकच स्वप्न होतं ते म्हणजे अभिनय करायचा.” त्याच्या बारीक शरीरयष्टीमुळे आणि सावळ्या रंगामुळे करिअरच्या सुरुवातीला अनेकदा नकारांचा सामना करावा लागला. तरीही त्याने कधी हार मानली नाही. “मी पार्टी करण्यासाठी आलो नाही” राजकुमार पुढे सांगतो, “सुरुवातीच्या दीड-दोन वर्षांत खूप कष्ट घ्यावे लागले, पण मी तयार होतो. मला माहीत होतं की, इथे मी कोणालाच ओळखत नाही. त्यामुळे माझा प्रवास मला स्वतःलाच घडवायचा होता. लोकांपर्यंत पोहोचायचं आहे , त्यासाठी एकच मार्ग होता, भेटीगाठी आणि ऑडिशन्स. मी रोज सकाळी बाहेर पडायचो, दिवसभर लोकांना भेटायचो, ऑडिशन द्यायचो. या शहरात मी पार्टी करण्यासाठी आलो नाही, तर अभिनेता होण्यासाठी आलो आहे, हे माझ्या डोक्यात पक्कं होतं. माझ्या आई-वडिलांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, त्यांची पूर्तता करण्यासाठी मी मनापासून मेहनत केली.” विविधतेचा अभिनयात ठसा आज राजकुमार रावनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘शाहिद’, ‘न्यूटन’, ‘स्त्री’, ‘बधाई दो’, ‘हिट’, ‘स्त्री २’ यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या विविध भूमिका प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरल्या आहेत. गंभीर, संवेदनशील आणि प्रयोगशील अशा नानाविध भूमिका साकारत त्याने सिद्ध केलं की, खरा अभिनेता तोच जो मेहनतीनं आणि प्रामाणिकपणानं पुढे जातो.