Rajgurunagar News – राजगुरुनगर नगरपरिषदेच्या वतीने मालमत्ता करावरील शास्ती (दंडात्मक व्याज) माफीसाठी ‘अभय योजना’ सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या दि. 19 मे 2025 च्या निर्णयानुसार आणि पुणे जिल्हाधिकार्यांच्या दि. 10 मार्च 2026 रोजीच्या आदेशान्वये या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, दि. 19 मे 2025 रोजी ज्यांच्यावर शास्तीची थकबाकी आहे अशा मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती अधिनियम 1965 च्या कलम 150 (क) नुसार, संबंधित थकबाकीदारांनी मालमत्ता कराची पूर्ण रक्कम आणि शास्तीपैकी 50 टक्के रक्कम भरून विहित नमुन्यात अर्ज केल्यास उर्वरित 50 टक्के शास्ती माफ केली जाणार आहे. ही अभय योजना केवळ एकदाच, सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी लागू असून तिची अंतिम मुदत दि. 31 मार्च 2026 पर्यंत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदार मिळकतधारकांनी नगरपरिषद कार्यालयात संपर्क साधून विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, असे आवाहन नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ आणि उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर यांनी केले आहे. दरम्यान, अर्जाचा नमुना नगरपरिषदेच्या करसंकलन विभागात उपलब्ध असून त्याच नमुन्यात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. अर्जासोबत सन 2025-26 च्या मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम (50% शास्ती वगळून) भरल्याची पावतीची छायाप्रत जोडावी, असे आवाहन करनिरीक्षक जगदीश नागलोत यांनी केले आहे.