Rajasthan Election Result 2023 : ‘लीक, लिकेज आणि लाल डायरी…’ : ‘या’ पाच कारणामुळे राजस्थानमध्ये गेहलोत सरकारला बसला फटका

Rajasthan Election Result 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या कलानुसार, भारतीय जनता पक्ष (BJP) पूर्ण बहुमताने राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणार्या अशोक गेहलोत यांची जादू काही चाललेली दिसत नाही. या विधानसभा निवडणुकीत ‘लीक, लिकेज, लाल डायरी’ असे काही मुद्दे गाजले, ज्याचे भांडवल भाजपने निवडणूक प्रचारात केले आणि तब्बल 5 वर्षांनी राज्यात पुनरागमन करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले.
राजस्थानच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटी, लाल डायरी, भ्रष्टाचार, मोदींची हमी, महिलांविरोधातील गुन्हे आणि कायदा आणि सुव्यवस्था असे मुद्दे पूर्ण ताकदीने मांडले. अशोक गेहलोत सरकारने निवडणुकीच्या वर्षात एकापाठोपाठ एक हालचाली केल्या. आरोग्य विम्याची मर्यादा 50 लाखांपर्यंत वाढवण्याची हमी, स्वस्त सिलिंडरसह सर्व आकर्षक आश्वासने पेपर लीक, लाल डायरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी झाकून टाकण्याचा प्रयत्न केला.
पेपर लीक प्रकरण
राजस्थान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी जोरदारपणे मांडलेल्या मुद्द्यांपैकी पेपर लीकचा मुद्दा होता. भाजपचे सरकार आल्यानंतर सर्व घोटाळ्यांची चौकशी करून दोषींना कारागृहात पाठवले जाईल, असे आश्वासन जनतेला दिले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर आरोप करताना, ‘ते स्वत:ला जादूगार म्हणवतात, मात्र त्यांनी आपल्या जादूने राज्यात भ्रष्टाचाराचा भ्रम पसरवला आहे. पेपर फुटणे ही एक सामान्य बाब झाली असून त्याला राजकीय संरक्षण मिळाले आहे. मोठमोठ्या कोचिंग इन्स्टिट्यूटवर छापे टाकल्यास मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांची नावे समोर येतील,’ असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
लाल डायरी केस
राजस्थानच्या राजकारणात लाल डायरीचा मुद्दा नवीन नाही. बऱ्याच काळापासून याचा उल्लेख केला जात होता, परंतु पंतप्रधान मोदींनी या निवडणूक प्रचारात याचा चांगला वापर करून घेतला. राजस्थान सरकारमधून बडतर्फ करण्यात आलेले मंत्री राजेंद्र गुडा यांच्याकडेही आमदारांच्या घोडेबाजाराचे खाते असल्याची चर्चा होती. या लाल डायरीचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले होते की, या डायरीची पाने जसजशी उघडली जात आहेत, तसतसे जादूगाराचे चेहरे उडाले आहेत.तसेच “काँग्रेस सरकारने गेल्या पाच वर्षांत तुमचे पाणी, जंगले आणि जमीन कशी विकली, हे लाल डायरीमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. राज्यात बेकायदा खाणकामाचे तार कोणाशी जोडले जात आहेत, हे कोणापासून लपून राहिलेले नाही.असे त्यांनी म्हटले होते.
गटबाजी
राजस्थानमध्ये काँग्रेसमध्येही गटबाजी पाहायला मिळाली. सीएम अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात निर्माण झालेला वाद कोणापासून लपून राहिलेला नाही. याचा परिणाम राज्यातील कार्यकर्त्यांवरही झाला आणि जनतेमध्ये चुकीचा संदेशही गेला. निवडणुकीपूर्वी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोघांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि ‘आम्ही एकत्र आहोत’ असा संदेशही दिला असला तरी त्याचा परिणाम निवडणूक निकालावर झालेला दिसत नाही.
कन्हैयालाल खून प्रकरण
राजस्थानच्या निवडणूक प्रचारात भाजपने उदयपूरच्या कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा मुद्दा जोरदारपणे मांडला. असे म्हणतात. राज्य जिंकायचे असेल तर आधी मेवाड जिंकावे लागेल आणि उदयपूर मारवाडमध्ये आहे, कन्हैयालाल खून प्रकरणाबाबत भाजपने काँग्रेस सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि अशोक गेहलोतही या जाळ्यात अडकले.
ईडीची एंट्री
पाच राज्यांतील निवडणुकांदरम्यान ईडीनेही दोन राज्यांत प्रवेश केला. राजस्थानमध्ये पेपर लीक प्रकरणी ईडीने प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासारा आणि काँग्रेस उमेदवार ओमप्रकाश हुडला यांच्या घरांवर छापे टाकले. काँग्रेसनेही निवडणूक प्रचारात हा मुद्दा उपस्थित केला होता. अशोक गेहलोत प्रत्येक पत्रकार परिषदेत या विषयावर बोलले पण त्याचा फायदा भाजपलाच होताना दिसत होता.




