गुणवडीत दैवबलवत्तर म्हणून रिक्षातील 10 जणांचा जीव वाचला : झाड कोसळल्याने रस्ता बंद
डोर्लेवाडी – बारामती शहरासह तालुक्यातील अनेक भागांत बुधवारी (दि. 18) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तर गुणवडी येथे दैवबलवत्तर म्हणून प्रावसी रिक्षातील 10 जणांचा जीव वाचला.
याबाबतची माहिती अशी की, बारामती वालचंदनगर रस्त्यावरून एक प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाला पावसामुळे पुढचे काही दिसत नसल्याने त्याने रिक्षा जागेवरच थांबली. त्यावेळी त्यातील एक जण उतरला. दरम्यान, थोडे दिसू लागल्याने रिक्षा दहा फूट पुढे गेली अन् काही मिनिटांतच जोराच्या वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले लिंबाचे भले मोठे झाड रिक्षा उभी होती त्या ठिकाणी कोसळले. रिक्षा पुढे गेली नसती तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे रिक्षातील दहा जणांचे दैवबलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचलाचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बारामती-वालचंदनगर रस्त्यावर वादळी वाऱ्यात लिंबाचे आणि बाभळीचे झाड कोसळल्याने एक तास वाहतूक बंद होती.
झाडे विद्युतपुरवठा करणाऱ्या तारेवर पडल्याने विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी येऊन तारा बाजूला करीत दोन-तीन तासांत वीजपुरवठा सुरळीत केला. गुणवडीतील विजय लक्ष्मण घोडे यांच्या घरावरील पत्रा उडून गेल्याने त्याचे खूप नुकसान होऊन त्याचा संसार उघड्यावर आला आहे. उडालेला पत्रा शेजारील घरासमोर असलेल्या अभिजित घोडे यांच्या दुचाकीवर पडला यात गाडीचे नुकसान झाले. तसेच उडालेला पत्रा अमोल घोडे यांच्या डाव्या हाताच्या खांद्याला कापल्याने ते जखमी झाले.
नुकसानभरपाईची मागणी
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात गुणवडी गावातील विजय लक्ष्मण घोडे यांच्या घरावरील पत्रा उडून गेल्याने त्यांचे नुकसान झाले असून त्यांचा संसार उघड्यावर आले आहे. तरी या घटनेचा महसूल आणि गुणवडी ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
सोमेश्वर परिसरात एक तास हजेरी
परिसरात सुमारे एक तास झालेल्या दमदार पावसामुळे पिकांना पुन्हा नवसंजवीनी मिळाल्याने बळीराजा आनंदी झाला आहे. महिना पूर्ण होत आला तरी पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता; परंतु बुधवारी (दि. 18) दुपारी चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने पिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सध्या सोमेश्वरनगर परिसरातील बाजरी व तूर हे पीक जोमात आले असून झालेल्या पावसाने पिकाला नक्कीच फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या महिन्यात काही दिवस वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता तर अधुमधून ढगांची दाटी होत होती. मात्र, पाऊस कोसळत नसल्याने पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झापाट्याने होत होता. त्यामुळे उभी तूर, बाजरी, ज्वारी, मका पिके हातची जाण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता; परंतु बुधवारी दुपारी पाऊस झाला अन् शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.