Bullet Train: भारतात बुलेट ट्रेन सेवा कधी सुरू होणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला खुलासा, जाणून घ्या

नवी दिल्ली – गुजरातमधील अहमदाबाद आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन सुरु करण्याच्या प्रकल्पावर मोदी सरकार खूप लक्ष देत आहे. सोमवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांसह सुरत ते नवसारी या बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गाचा आढावा घेतला. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, 2026 मध्ये गुजरातमधील सुरत ते बिलीमोरा दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन सुरु होईल असा विश्वास आहे. तसेच अहमदाबाद ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेनसाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीत चांगली प्रगती झाली आहे आणि काम वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी सुरतच्या चोर्यासी तालुक्यातील वक्ताना गावाजवळ मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या विभागीय कास्टिंग यार्डच्या ऑपरेशनची पाहणी केली. याशिवाय प्रकल्पांतर्गत बांधकाम सुरू असलेल्या अंतोली रेल्वे स्थानकालाही भेट दिली. यानंतर ते रेल्वे राज्यमंत्री दर्शन जरदोश यांच्यासोबत नवसारीतील नसीलपूर येथील प्रकल्पस्थळाला भेट दिली.
पाहणीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 61 किमी मार्गावर खांब बसविण्यात आले असून सुमारे 150 किमी मार्गावर काम सुरू आहे. 508 किमी लांबीच्या प्रकल्पापैकी 91 टक्के प्रकल्प एलिव्हेटेड असून केवळ चार किमी लांबीची लाईन जमिनीवर आहे. सात किलोमीटरचा भाग महाराष्ट्रात समुद्रातून जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मार्गावर एकूण 12 रेल्वे स्थानके बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यातील आठ गुजरातमध्ये आणि चार महाराष्ट्रात असतील.
रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, नवीन वंदे भारत ट्रेन, ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम, बुलेट ट्रेन यासारख्या अत्याधुनिक आणि सर्वोत्तम सेवा पुरवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की 130 कोटी भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
महाराष्ट्रात संथ गतीने काम –
बुलेट ट्रेन प्रकल्पावर महाराष्ट्रात सुरू असलेल्या कामाबद्दल बोलताना ते म्हणाले की, तेथील भूसंपादनातील अडचणींमुळे काम मंदावले आहे. महाराष्ट्राने सहकार्याच्या भावनेने प्रकल्पावर काम करावे.
महाराष्ट्र सरकारवर टीका
महाराष्ट्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, हा राष्ट्रीय प्रकल्प असून त्यावर कोणतेही राजकारण नको. मला खात्री आहे की आम्ही या प्रकल्पावर एकत्र काम करून एक आदर्श निर्माण करू. जोपर्यंत महाराष्ट्रातील भूसंपादन पूर्ण होत नाही तोपर्यंत गुजरातवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान हाय स्पीड रेल (HSR) कॉरिडॉरवर 320 किमी प्रतितास वेगाने बुलेट ट्रेन चालवण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. दोन्ही शहरांमधील रेल्वे प्रवासाचा वेळ सध्याच्या सहा तासांवरून तीन तासांवर आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.





