प्रभात वृत्तसेवा उरुळी कांचन – पुणे-सोलापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण, महामार्गाचे रुंदीकरण, तसेच पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आखण्यात आलेल्या नवीन रेल्वेमार्गांच्या योजनांमुळे उरुळी कांचन परिसरात आर्थिक उलाढाल आणि गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते अहिल्यानगर या प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गासाठी तळेगाव ते उरुळी कांचन या 75 किमी मार्गात उरुळी कांचन येथे 100 हेक्टरवर मेगा रेल्वे टर्मिनल उभारण्यात येणार आहे. हा रेल्वेमार्ग तळेगाव, चाकण, आळंदी, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, सुपे, चास आणि अहिल्यानगर अशा आठ स्थानकांद्वारे जोडला जाणार असून, चाकण व रांजणगावसारख्या औद्योगिक पट्ट्यांना त्यामुळे विशेष फायदा होणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने लवकरच भूसंपादनास सुरुवात होणार आहे. शेतकर्यांना न्याय्य मोबदला दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.या कामामुळे पुणे परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार असून, दोन नवे रिंगरोड्स आणि प्रस्तावित विमानतळाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन, शिक्रापूर, लवळे, पेरणे आणि आसपासच्या गावांमध्ये व्यावसायिक व औद्योगिक संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. संपादित करण्यात येणार्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकर्यांना योग्य तो दर दिला जाणार असून, यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच हा मार्ग सोलापूर मार्गाला जोडण्यात येणार असून त्यासाठी भूसंपादन करण्यात यावे, असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने दिला आहे. हे काम पुढील चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून यासाठी तळेगाव येथे न्यू तळेगाव व उरुळी कांचन येथे नवीन स्टेशन उभारले जाणार आहेत. लहान-मोठ्या व्यवसायांना चालना प्रस्तावित विमानतळ, रिंगरोड व रेल्वे टर्मिनलमुळे गावागावांत गोदाम, मालधक्के, इतर व्यवसाय सुरू होण्यास संधी निर्माण होणार आहे. परिणामी रोजगार निर्मिती वाढणार, तर जमिनींच्या खरेदी-विक्रीतून महसूलात मोठी वाढ अपेक्षित आहे. 10 ते 25 किमी अंतरातील सर्वच गावांमध्ये गुंतवणूकदारांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. “उरुळी कांचनची बाजारपेठ ही तीन तालुक्यात प्रसिद्ध व विश्वासार्ह मानली जाते. प्रस्तावित विमानतळ अवघ्या 10 किमी अंतरावर, आणि नव्याने उभारले जाणारे रेल्वे टर्मिनल 100 हेक्टरवर होणार असल्याने परिसरातील आर्थिक उलाढाल प्रचंड प्रमाणात वाढेल. हे उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाचे आहे”. – ऋतुजा कांचन, सरपंच, उरुळी कांचन (ता. हवेली) विशेष लक्षवेधी मुद्दे : -75 किमी लांबीचा नवीन रेल्वेमार्ग -100 हेक्टरवर मेगा रेल्वे टर्मिनल उरुळी कांचनमध्ये -चाकण, शिक्रापूर, रांजणगाव यांसारख्या औद्योगिक पट्ट्यांना थेट जोडणी -रोजगार, वाहतूक सुविधा, व महसूल वाढीला हातभार