Raigad Politics: रायगडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! महायुतीत ‘ऑल ओके’, आमदार महेंद्र थोरवेंचा मोठा दावा
Raigad Politics: भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय एकत्रितपणे काम करणार; आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोलीत स्पष्ट केली महायुतीची भूमिका.

Raigad Politics – महायुतीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाची बैठक झाल्यानंतर परस्परांतील मतभेद दूर झाले आहेत. रायगड जिल्ह्यासह राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय हे चारही घटक पक्ष एकत्रितपणे काम करणार आहेत. आगामी निवडणुकाही महायुती म्हणूनच लढवल्या जातील, असे आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोली येथे सांगितले.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या या वक्तव्याची रायगडच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महायुतीत असतानाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे लढवल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात दोन्ही पक्षांमधील मतभेद कायम असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली होती. या आघाडीने कर्जत पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे रायगडच्या राजकारणात महायुतीच्या स्थानिक समीकरणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर थोरवे आणि तटकरे यांच्यातील वाढलेली राजकीय जवळीकही चर्चेत आली. परंतु त्यानंतर सुधाकर घारे काही दिवस ‘नॉट रीचेबल’ असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
या पार्श्वभूमीवर महायुतीतील मतभेद संपल्याचे थोरवे यांनी स्पष्ट केल्याने रायगडमधील राजकीय समीकरणांना पुन्हा कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी निवडणुकांमध्ये महायुती म्हणून एकत्रितपणे लढण्याची भूमिका स्पष्ट झाल्यास स्थानिक पातळीवरील विद्यमान राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
वरिष्ठांच्या निर्णयाकडे राजकीय नेत्यांचे लक्ष
विशेषतः विधानसभा निवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेणार असल्याचे असल्याचे सांगत त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे उमेदवारी आणि जागावाटपाबाबतही आता वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयाकडे रायगडमधील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.
आमदार थोरवे यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, पुढील काळात सुधाकर घारे यांची राजकीय भूमिका आणि त्यांची पुढील वाटचाल काय असेल, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.






